उंडवडी : अवकाळीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त; खरीपासह रब्बी हंगामातही नुकसानीचा फटका | पुढारी

उंडवडी : अवकाळीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त; खरीपासह रब्बी हंगामातही नुकसानीचा फटका

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील उंडवडी सुपेसह आजूबाजूच्या परिसरात ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी खरीपासह रब्बी हंगामातीलही पिके नुकसानग्रस्त होण्याचे संकट वाढले असून सातत्याने होणा-या आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

उंडवडी सुपे भागात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. परंतु काही दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे व थंडीचे प्रमाण कमी झाल्याने रब्बी हंगामतील पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. पिके धोक्यात आली आहेत. शेतकरी दुहेरी संकटात सापडण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने तालुक्यातील खरीप हंगामाची पूर्णपणे वाट लागली. त्यातच आता रब्बीच्या पिकांवरही ढगाळ वातावरणामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. अगोदरच शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा ढगाळ वातावरणामुळे मेटाकुटीला आला आहे.

तालुक्यातील शेतक-यांनी दिवाळीनंतर आपल्या शेतीच्या मशागती करून रब्बीची पेरणी सुरू केली. पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ऊसामध्ये कांदा, हरभरा आदी आंतरपिकेही केली आहेत. त्याबरोबरच कांदा, गहू, ज्वारी, हरभरा यांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली आहे, परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

पिके वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी
पिकांना वाचविण्यासाठी शेतक-यांनी विविध औषधांनी फवारणी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहेत. त्यात वातावरणात उष्णताही भरपूर आसल्याने पिकेही सुकू लागली आहेत.

कांदा लागवडीवरच प्रश्नचिन्ह

गहू व कांद्याचे क्षेत्र मोठे आहे. सुरुवातीपासूनच रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि गायब झालेली थंडी यामुळे गव्हावर मावा पडण्याची भीती असून परिसरातील उन्हाळी कांद्याचे रोप परतीच्या पावसाने गेले, मात्र आहे त्या रोपामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अजूनही शेतकरी कांदा लागवड करत आहेत. या हवामानामुळे नवीन लावलेल्या कांद्यावरही करप्याने आक्रमण केल्याने नवीन लागवड धोक्यात आली आहे.

Back to top button