सिंहगड, राजगड हाऊसफुल्ल; वाहतूक सुरळीत; खाऊ गल्लीमध्ये पर्यटकांची झुंबड
वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : सिंहगडासह राजगड, तोरणा, खडकवासला धरण परिसरात रविवारच्या सुट्टीचे निमित्त साधून पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. गडावरील वाहनतळही पूर्ण भरून गेला होता. वनविभागाने सकाळपासूनच नियोजन केल्याने सिंहगड घाट ररस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. तोरणा, राजगडसह पानशेत धरण परिसर, खडकवासला चौपाटीही पर्यटकांनी गजबजून गेली होती.
गडावरील वन खात्याच्या विश्रामगृहाजवळ खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या खाऊगल्लीत पर्यटकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. पन्नासहून विक्रेत्यांनी वन खात्याने दिलेल्या जागेत झुणका – भाकर, कांदा – भजीसह खाद्यपदार्थ, दही – ताक, सरबताची विक्री केली. गेल्या महिन्यात वन खात्याने गड व गडाच्या मार्गावरील 138 खाद्यपदार्थ विक्रेत्यांची हॉटेल, शेड जमीनदोस्त केली होती. त्यानंतर वनविभागाने नव्याने दिलेल्या जागेत विक्रेत्यांनी स्टॉल लावण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान खडकवासला धरण चौपाटी, पानशेत धरण परिसरासह राजगड, तोरणा गडावर पुण्यासह बाहेर गावच्या पर्यटकांनी गर्दी केली होती. खडकवासला चौपाटीवरील पुणे – पानशेत रस्त्यावरील वाहतूक कोलमडली. रात्री आठ वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी कायम होती.
दिवसभरात वनविभागाची धावपळ सिंहगड वन विभागाचे वन परिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके व वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांनी वाढती गर्दी पाहून वाहतुकीचे नियोजन करून गडावरील वाहनतळापासून घाट रस्त्याच्या दोन्ही मार्गावर सुरक्षारक्षक तैनात केले. नितीन गोळे, शांताराम लांघे, रमेश खामकर यांच्यासह तीसहून अधिक सुरक्षारक्षक सुरळीत वाहतुकीसाठी धावपळ करीत होते. दिवसभरात दोन्ही मार्गाने गडावर पर्यटकांची चारचाकी 519 व दुचाकी 1432 वाहने गेली.
यापूर्वी वाहनतळ फुल्ल झाल्याने दुपारनंतर अनेकदा घाट रस्ता वारंवार बंद करण्याची वेळ येत होती. अतिक्रमण कारवाईनंतर घाट रस्ता बंद करण्याची वेळ आली नाही. पर्यटकांची संख्याही वाढत आहे, तरीही वाहतूक सुरू आहे. मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी करूनही कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नाही.
– बाळासाहेब जिवडे, वनरक्षक
माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे म्हणाल की, गडावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना योग्य ठिकाणी जागा देण्याची गरज आहे. सर्व विक्रेते स्थानिक आहेत. खाद्यपदार्थ विक्रीवर त्यांची उपजीविका आहे. गडाचे ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवून वन विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी.
– नवनाथ पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्यउघड्यावर खाऊ गल्ली सुरू केली आहे. मोजकेच विक्रेते झाडाखाली बसतात, इतर उघड्यावर आहेत. उन्हाचा विक्रेते व पर्यटकांना त्रास होतो.
– अमोल पढेर, माजी उपसरपंच, घेरा सिंहगड