पिंपरी : आकुर्डी रेल्वे स्टेशनवर सकाळच्या वेळी लोणावळ्याकडे जाणार्या लोकलमध्ये चढणार्या काही प्रवाशांच्या मोबाईलची चोरी करण्यात आली. ही घटना शुक्रवार (दि. 9) घडली. महागडे मोबाईल फोन चोरीस गेल्यामुळे संबंधितांनी संताप व्यक्त केला. या घटनेमुळे रेल्वे स्टेशनवर मोबाइलचोर सुसाट झाल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी रेल्वे सिग्नल अॅटोमेटिक (डिजीटल) केल्यामुळे काही रेल्वे स्थानकांवर स्टेशन मास्तर कार्यरत नाहीत. लोणावला ते पुणे या दरम्यान 16 स्टेशन आहेत; त्यापैकी ठराविकच फक्त 7 स्टेशन मास्तर कार्यरत आहेत. तसेच ठराविक स्टेशनवर रेल्वे पोलिस कार्यरत असतात.
त्यामुळे या चोरांचे फावत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. मोबाईलमध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम बँक खाते लिंक असल्याने आनलाइन पैसे जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. राजरोसपणे चोर्या होत असल्याने रेल्वे प्रशासन भरपाई मिळवून देणार का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. मोबाईल चोरीची तक्रार करण्यासाठी त्यांना चिंचवड किंवा पुणे गाठावे लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचा घेतात फायदा. फलाटावर ज्या ठिकाणी महिलांचा फर्स्ट क्लासचा डबा येतो, त्या ठिकाणी जास्त करून चोरी होते. येथे सीसीटीव्ही नसल्यामुळे चोर आपला डाव साधतात.
आरपीएफ, जीआरपीएफ तसेच स्टेशन मास्तर नसल्याने चोरट्यांचे फावते आहे. प्रवाशांनीही लोकलमध्ये चढताना वा उतरना आपल्या वस्तूंची खबरदारी घ्यावयास हवी. सतर्क रहावयास हवे.
– महेंद्र आयगुडे, बुकिंग क्लर्क