

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील सुरू असलेली पीएमपीएमएलची सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. परंतु, या निर्णयामध्ये फेरबदल करावा लागला आहे. ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या आहेत.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस 11 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आणखी 12 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. पीएमपीएमएल प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत होती. मात्र, ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपीएमएलचे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना सोेमवारी (दि.5) बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना पीएमपीएमएल प्रशासनाने ग्रामीण भागात अनेक मार्गांवर बससेवा सुरू केली होती. जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर एसटीची बससेवादेखील सुरू झाली. त्यामुळे महामंडळाने पीएमपीएमएलकडे पत्र लिहून या मार्गांवरील बससेवा बंद करण्याची विनंती केली होती. पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला होता.