कारवाई होणार नसेल तर महाराजांचे नाव घेता कशाला?: उदयनराजे भोसले; 3 डिसेंबरला आक्रोश मेळावा | पुढारी

कारवाई होणार नसेल तर महाराजांचे नाव घेता कशाला?: उदयनराजे भोसले; 3 डिसेंबरला आक्रोश मेळावा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून, येत्या 3 डिसेंबरला जनआक्रोश मेळावा घेणार असल्याची घोषणा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाकडून अवमानाची दखल घेतली जात नसेल तर त्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या वक्तव्याबद्दल भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्यातील विविध शिवप्रेमी संघटनाची खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सोमवारी (दि.२८) बैठक झाली. त्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना 3 डिसेंबर नंतर भेटून गाऱ्हाणे मांडणार असल्याचे उदयनराजे यांनी जाहीर केले.

भोसले म्हणाले, सर्व प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष सभा समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतात, त्यांच्या विचारांना आदर्श मानतात. मात्र दुसरीकडे महाराजांच्या बद्दल लेखन, चित्रपट आणि वक्तव्यातून अवहेलना होत असताना कुणाला कसा राग येत नाही. तुमच्या राजकीय पक्षांचा अजेंडा वेगळा असेल, तर मग महाराजांचे नाव का घेता? असा सवाल देखील भोसले यांनी राजकीय पक्षांना केला. प्रत्येकजण राजकारण करणार असेल, बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई होणार नसेल, तर त्यांना महराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही असा पुनरुच्चार केला. महाराजांची अवहेलना होते त्यावर सर्व पक्षप्रमुखांनी आपली स्पष्ट भूमिका मांडण्याचे आवाहन केले. शासनाच्या वतीने महाराजांचा इतिहास अधिकृतपणे अद्यापही मांडण्यात आलेला नाही. तो मांडायला हवा.  राज्यपालांवर कारवाई करणार नसाल तर महराजांचे नाव घेऊ नका, अशा शब्दांत नाव न घेता भाजपला भोसले यांनी इशारा दिला. राज्यपालांची पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी करत, या प्रकरणाची दखल घेतली नाही तर निवडणुकीमध्ये जनता दखल घेईल, असं देखील भोसले यांनी सांगितले.

उदयनराजेंना अश्रू अनावर…

प्रमुख पक्ष श्रेष्ठींना महाराजांचे बेगडी प्रेम कशाला हवे, महाराजांचे नाव विमानतळ, रेल्वेस्टेशनला कशाला देता, शिवजयंती, शिवप्रताप दिन साजरा कशाला करता, महाराजांचे पुतळे कशाला उभे करता? असे प्रश्न उपस्थित करताना महाराजांच्या कुटूंबाचा घटक म्हणून मला वेदना होतात. हे दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असे म्हणत उदयनराजे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

महाराजांचा अवमान होत असल्यास आता लोकांनीच विचार करायला हवा. मोडलेला आणि सोयीप्रमाणे मांडलेला इतिहास नव्या पिढीसमोर मांडला जात आहे. तोच त्यांना खरा वाटेल. त्यामुळे यापुढे महाराजांचा अवमान केल्यास त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Back to top button