नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे- सातारा जिल्ह्याला जोडणारा सारोळा येथील निरा नदीवरील पूल महत्त्वपूर्ण आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावर अपघात, घातपात, आत्महत्या करण्याच्या घटना वाढत आहेत. पूल घातपात व सुसाईड पॉइंट ठरत आहे. पुलावर प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. सारोळा येथील निरा नदीवर एक जुना व दोन नवीन असे पूल आहेत. पुलावरून आतापर्यंत 50 हून अधिक जणांनी आत्महत्या केली आहे. पुलावरील अपघातातही अनेकांचे प्राण गेले आहेत. तसेच घातपात करून नदीत मृतदेह फेकून देण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
येथील पुलावरून नुकतीच राज्य पणनच्या एका वरिष्ठ अधिकार्याने उडी मारून आत्महत्या केली होती. तर काही दिवसांपूर्वी पुण्यातील कचरा ठेकेदाराने उडी मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पुलावरून 2019 पासून 26 जणांनी उडी मारून आत्महत्या केल्याची नोंद राजगड व शिरवळ पोलिस ठाण्यात आहेत. मात्र काही नोंदी नसल्याचे बोलले जात आहे. तर नदीपात्रात वाहने कोसळून अनेकांचे जीव गेले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात खून करून मृतदेह नदीत आरोपीने टाकला होता. त्यामुळे पुलावर सीसीटीव्ही व पोलिस बंदोबस्ताची गरज आहे.
सारोळा येथील नदीवरील पुलावरून साडेतीन वर्षांत 26 जणांनी नदीत उडी घेऊन जीवन संपवले आहे. लोकांची मानसिकता लक्षात घेता ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.