

उरुळी कांचन; पुढारी वृत्तसेवा: पुणे- सोलापूर महामार्गावरील पेठ- नायगाव (ता. हवेली) हद्दीत मार्ग वस्तीजवळ सुभाष चौधरी (वय 54) यांच्या खुनाचे गूढ लोणी काळभोर पोलिसांनी उघडकीस आणले आहे. दारू पिण्याच्या वादातून चुलतभावानेच खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सुभाष भगवंत चौधरी (वय 54, रा. वडाची वाडी, नायगाव, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संपत तुकाराम चौधरी (वय 46, रा. वडाची वाडी पेठगाव) असे अटक करण्यात आलेल्या चुलतभावाचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष यांचा मुलगा सौरभ यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव- पेठ (ता. हवेली) हद्दीत सुभाष चौधरी यांचा मृतदेह शनिवारी (दि. 29) आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर चौधरी यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचे कारण व संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता.
तपास करीत असताना सुभाष चौधरी आणि आरोपी संपत चौधरी हे चुलतभाऊ आहेत. ते म्हसोबा मंदिरासमोरील मार्ग वस्ती येथे शुक्रवारी (ता. 28) सायंकाळी दारू पिण्यास बसले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका पेटला की, संपत याने सुभाष याच्या चेहर्यावर धारधार शस्त्राने वार केला. त्यात सुभाष हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान खुनाचे कारण कळताच चुलतभाऊ संपत चौधरी याला अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक देशमुख करीत आहे.