सरकार अतिशय उत्तम चालले आहे : चंद्रकांत पाटील
![चंद्रकांत पाटील](https://pudhari.news/wp-content/uploads/2022/08/images_1563433805955_images_1522065724154_chandrakant_patil-780x470.jpg)
पुणे : राज्य सरकारला शंभर दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे. पहिल्या दिवसापासूनच अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले सरकार पडेल, असे म्हणतात. परंतु तसे झाले नाही. सरकार अतिशय उत्तम चालले आहे. रोज लोकोपयोगी निर्णय होत आहेत. कुणीही नाराज नाही आणि नाराजांची समजूत काढण्याची व्यवस्था आमच्या सरकारकडे आहे, असा टोला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे. सेक्सटॉर्शन प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, या आठवड्यात पालकमंत्री म्हणून सर्वच विषयांचा आढावा घेणार आहे. पोलिस मुख्यालयाचा आढावा घेताना या प्रकरणात तक्रार नोंदविण्यापासून प्रबोधन तसेच तक्रारीसाठी धाडस वाढविण्यासाठी काही उपायांचा विचार होईल.
पाटील म्हणाले, 75 हजार पदांची भरती करण्याचा संकल्प सरकारचा आहे. त्यानुसार सर्वच विभागांनी रिक्त पदांचा तपशील जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. ‘मविआ’ सरकार अल्पमतात आल्यानंतर काही हजार निर्णय बेकायदा असूनही घेण्यात आले. त्यामुळे काही कामांना स्थगिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘सरकार कार्यकाळ करेल आणि पुन्हा सत्तेतही येऊ’
नागपूर : राज्यातील शिंदे भाजप सरकार अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. एवढेच नाही तर पुन्हा सत्तेतही येईल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, सरकार हे राज्याच्या विकासासाठी पूर्ण गतीने कार्यरत आहे. त्यामुळे विरोधक त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही अस्वस्थ आहेत. राज्यात स्थिर सरकार आले आहे. काम करणारे सरकार आले आहे. आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, एवढेच नाही; तर पुन्हा एकदा आम्हीच सत्तेत येऊ.