यंदा अकरावीच्या 33 हजारांवर जागा राहणार रिक्त प्रवेशाचा आज शेवट
पुणे : पुढारी वृत्तसेवा : दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात सतत विशेष फेरीचा आज (दि. 15) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा आजच शेवट होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत 78 हजार 627 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयात आपले प्रवेश निश्चित केले आहेत. तरी देखील यंदा 33 हजारांवर जागा रिक्तच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आले. प्रवेशासाठी तीन नियमित व तीन विशेष प्रवेश फेर्या राबविण्यात आल्यानंतर प्रवेशासापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी, अर्थात सतत विशेष फेरी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना दररोज प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली. त्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु अकरावी प्रवेशाला यंदा विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यातुलनेत यंदा आयटीआय आणि दहावीनंतरच्या तंत्रशिक्षण डिप्लोमाला विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकरावी प्रवेश
प्रक्रिया दृष्टिक्षेपात
एकूण महाविद्यालये – 318
एकूण प्रवेशक्षमता – 111750
एकूण नोंदणी – 107843
कोटा प्रवेशक्षमता – 15418
कोटांतर्गत प्रवेश – 10172
कॅप प्रवेशक्षमता – 96332
कॅप अंतर्गत अर्ज – 76049
एकूण प्रवेश – 78627
रिक्त जागा – 33123