![सार्वजनिक परिसरात केरकचरा टाकणार्यांचा समाचार घेताना मुख्य अधिकारी स्मिता काळे.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F10%2FCapture-144.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
माळेगाव; पुढारी वृत्तसेवा: माळेगाव नगरपंचायत परिसरात भरणार्या भाजी मंडईच्या ठिकाणी व रस्त्यावर केरकचरा टाकणार्या नागरिकांची कानउघाडणी करीत मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. नगरपंचायत प्रशासनाने माळेगावहद्दीत स्वच्छता राखली जावी, यासाठी वारंवार स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 8) मुख्याधिकारी काळे यांनी माळेगावात विविध ठिकाणांची पाहणी केली. भाजी मंडईच्या ठिकाणी काही नागरिक केरकचरा टाकत असल्याचे निदर्शनास आल्याने काळे यांनी केरकचरा टाकणार्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्यांची गय करू नका, असे बजावले. तसेच, सूचनांचे पालन न करणार्यांवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना त्यांनी नगरपंचायत कर्मचार्यांना दिल्या. कर्मचार्यांनीदेखील केरकचरा गोळा करण्यासाठी दक्ष राहावे, असे खडे बोल त्यांनी कर्मचार्यांना सुनावले.