वडगाव: ...तर अधिकारीही काम करू शकणार नाहीत, साखर आयुक्त गायकवाड यांचे मत
वडगाव: सर्वसामान्य माणूस कायदेतज्ज्ञांपेक्षा खूप हुशार असतो. त्यामुळे माणूस ओळखता आला नाही तर प्रशासकीय अधिकारीही कारभार करू शकणार नाहीत, असे मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.
मावळ विचार मंचाच्या वतीने आयोजित सरस्वती व्याख्यानमालेत सातवे पुष्प गुंफताना ‘प्रॉपर्टी व माणूस’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी सतीश राऊत होते. या वेळी उद्योगपती रामदास जैद, मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ.रवींद्र आचार्य, अध्यक्ष सुदेश गिरमे उपस्थित होते.
गुंतागुंतीचे व्यवहार करण्याचे टाळा
वाढत्या खटल्यांची संख्या रोखायची असेल तर गुंतागुंतीचे व्यवहार टाळले पाहिजेत. दाव्यांच्या निकालात समानता हवी, साठेखत व खरेदीखत यातील वेळ कमी असावा, जेवढे पैसे तेवढीच जमीन हा निकष पाळला गेला पाहिजे, असे अनेक उपायही गायकवाड यांनी सांगितले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी सतीश राऊत, उद्योगपती रामदास जैद यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी शहरातील खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अरुण वाघमारे यांनी केले, मानपत्र वाचन आरती राऊत यांनी केले. तर, प्रसाद पिंगळे यांनी आभार मानले.
देशात चार कोटी खटले सुरू
साखर आयुक्त गायकवाड यांनी या वेळी बोलताना न्यायालयीन प्रक्रियेत कार्यरत असताना आलेल्या अनेक अनुभवांचा दाखला देत कायद्यातील पळवाटा आणि सर्वसामान्य माणसाकडून या पाळवाटांचा कसा वापर होतो याविषयी अनेक उदाहरणे दिली. कायद्याची प्रक्रिया माहिती नसणे, सामाजिक ईर्षा, प्रशासकीय कारणे अशा विविध कारणांमुळे प्रॉपर्टी वादाचे प्रकार वाढत असून सद्यस्थितीत देशात सव्वाचार कोटी खटले सुरू आहेत.