पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला शुक्रवारी (30 सप्टेंबर) वादळी पावसाचा फटका बसला. वाहनतळ आणि इमारतीला जोडणार्या भागाच्या छताला लावण्यात आलेले सिलिंगचे प्लेट पत्त्यासारखे उडून पडले होते. यात जिल्हाधिकार्यांच्या वाहनाची काच फुटले. या वादळी वार्यामुळे नेमके नुकसान किती झाले आहे, याचे आम्ही विश्लेषण करतोय, अशी माहिती शाखा अभियंत्यांनी दिली. हरित इमारतीच्या निकषांवर आधारित जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बांधण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्चून इमारतीचे वादळ, वारा, पाऊस तसेच अतिउष्णता, हवा आदींवर आधारित पर्यावरणपूरक बांधकाम करण्यात आले.
मात्र, शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस झाला. त्याचा जोरदार फटका जिल्हाधिकारी कार्यालयाला बसला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे पाचमजली इमारतींचे 'अ' आणि 'ब' असे दोन मनोरे असून, जोरदार वार्यामुळे प्रत्येक मजल्यावरील छतासाठी बनविण्यात आलेले सिलिंगचे तुकडे पत्त्यासारखे उडाले. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने सिंलिगचे पूर्ण प्लेट काढून टाकले असून, छताला रंगकाम केले जात आहे.
शासकीय इमारत, पूल, रस्ता बांधल्यानंतर पुढील काही वर्षे डागडुजीची जबाबदारी कंत्राटदारावर असते. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेले नुकसान हे नैसर्गिक असून, दुरुस्तीचा खर्च बांधकाम विभाग करीत आहे. किती नुकसान झाले आहे, अशी विचारणा शाखा अभियंत्याकडे केली असता, वरिष्ठांच्या परवानगीशिवाय माहिती देता येणार नाही तसेच आम्ही अजून नुकसानीची माहिती जुळवत आहोत, असे सांगितले.