कळंबला महामार्गाचे काम पुन्हा सुरू
मंचर; पुढारी वृत्तसेवा: पुणे-नाशिक नवीन महामार्गाच्या रस्त्याचे काम आंबेगाव तालुक्यातील कळंब गावातील वर्पेमळा येथील शेतकर्यांनी गेल्या काही दिवसांपासून अडविले होते. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व पोलिसांनी बुधवारी( दि.28) बैठक घेऊन शेतकर्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून घेतल्यानंतर शेतकर्यासमक्ष काम पुन्हा सुरू करण्यात आले.
शेतकरी शिवाजी दत्तात्रेय भालेराव, तुळशीराम महादू वर्पे, दगडू नारायण वर्पे, तान्हाजी बाबूराव वर्पे, विलास चिमाजी वर्पे यांच्यासह अनेक शेतकर्यांशी राष्ट्रीय महामार्गाचे सहायक अभियंता दिलीप शिंदे व पोलीस अधिकार्यांनी संवाद साधला. अडचणी समजावून घेतल्या.
“पूर्वी जागेच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन मार्किंग करण्यात आले. त्याप्रमाणे रस्त्याचे काम सुरू आहे. शेतकर्यांना मोबदला दिला आहे. काही शेतकर्यांनी हरकती घेतल्याने त्याचे पैसे न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे,” असे राष्ट्रीय महामार्गाचे सहायक अभियंता दिलीप शिंदे यांनी सांगितले.