हेरिटेज पुलाची ‘शोभा’; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुशोभीकरणाचा लाखोंचा खर्च वाया | पुढारी

हेरिटेज पुलाची ‘शोभा’; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुशोभीकरणाचा लाखोंचा खर्च वाया

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बंडगार्डन आणि येरवड्याला जोडणार्‍या मुळा-मुठा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर लाखो रुपये खर्च करून केलेल्या सुशोभीकरणाची दुरवस्था झाली आहे. जागोजागी गवत उगवले असून नागरिकांना बसण्यासाठी केलेल्या कट्ट्यांवरील फरशा तुटल्या आहेत. याबाबत प्रशासनाला वारंवार कळवूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

बंडगार्डन आणि येरवडा परिसराला जोडण्यासाठी ब्रिटिशांनी 1867 साली मुळा-मुठा नदीवर दगडी पूल (जुना फ्रिट्झगेरॉल्ड) बांधलेला आहे. या पुलास शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर ब्रिटन शासनाकडून पुणे महापालिकेला पत्र आले. त्यामध्ये त्यांनी सदर पूल शंभर वर्षांचा झाल्याने त्याचा वापर करण्यात येऊ नये, असे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने या पुलाच्या शेजारी 1982 मध्ये नवीन पूल बांधला आणि 2000 पासून जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर 2011 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू बांधण्यात आला.

वाहतुकीसाठी बंद केलेल्या ब्रिटिशकालीन पुलाचा वापर कलाकार आणि नागरिकांसाठी व्हावा, यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी जवळपास एक कोटी रुपये खर्च करून या पुलाचे सुशोभीकरण क ेले. नागरिकांना बसता यावे, चालता यावे, लहान मुलांना खेळता यावे, यासाठी येथे व्यवस्था करण्यात आली. तसेच कलाकारांना आपली कला सादर करता यावी, यासाठी महात्मा फुले आर्ट प्लाझा तयार करण्यात आला. पुलाच्या दोन्ही बाजूंना डेकोरेटीव्ह विद्युत पोल बसविण्यात आले. पुलाच्या दोन्ही बाजूस प्रवेशद्वार व सुरक्षा रक्षकांच्या केबीन करण्यात आल्या.

एक वर्ष महापालिका प्रशासनाने या पुलाच्या सुशोभीकरणाची आणि स्वच्छतेची काळजी घेतली. त्यानंतर मात्र, मागील एक वर्षापासून महापालिका प्रशासनाचे या पुलाकडे आणि सुशोभीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. आर्ट प्लाझाचा फलक अडगळीला पडलेला आहे. येरवड्याकडील प्रवेशद्वारावर मेट्रोच्या साहित्यासह वाहनांनी अतिक्रमण केले आहे.

नागरिकांना बसण्यासाठी तयार केलेल्या कट्ट्यांच्या फरशा तुटलेल्या असून जागोजागी मोठे गवत वाढले आहे. या गवतामुळे डासांची संख्या वाढली आहे. तसेच महागडे डेकोरेटिव्ह पथदिवेही बंद पडलेले आणि फुटलेले आहेत. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही उद्यान विभाग आणि क्षेत्रीय कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवत टोलवाटोलवी करत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

नागरिकांच्या सोयीसाठी आणि कलाकारांना कला सादर करता यावी, यासाठी लाखो रुपये खर्च करून पुलाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र, मागील एक वर्षापासून महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने सुशोभीकरणाचे नुकसान झाले आहे. फरशा तुटलेल्या आहेत, गवत वाढले आहे. प्रशासनाने सर्व कामे करून कलाकारांना कला सादर करण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.

                                                             – संजय भोसले, माजी नगरसेवक, शिवसेना

Back to top button