राजगुरूनगर : संतप्त नागरिकांची पंचायत समितीच्या अतिक्रमणावर धाव, अतिक्रमण असलेले बांधकाम तोडीत तीव्र आंदोलनाची सुरुवात | पुढारी

राजगुरूनगर : संतप्त नागरिकांची पंचायत समितीच्या अतिक्रमणावर धाव, अतिक्रमण असलेले बांधकाम तोडीत तीव्र आंदोलनाची सुरुवात

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : राजगुरूनगर शहराच्या वाडा रस्त्यावर तातडीने उपाययोजना राबवाव्यात अन्यथा शहर बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सर्व शासकीय यंत्रणांना नागरिकांनी दिला. भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस यांनी अतिशय परखड मनोगत व्यक्त करीत खेड पंचायत समितीचे या रस्त्यावर अतिक्रमण असलेले बांधकाम तोडीत तीव्र आंदोलनाची सुरुवात केली. याशिवाय मंगळवारी (दि. २७) जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

शहरातील रस्ते, गटर, पाणी पुरवठा लाईन यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने मुख्यत्वे नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम व महसुल विभाग, पोलीस प्रशासनाविरोधात अनेकांनी प्रखर शब्दात व परखड टीका केली. शहरातील वाडा रस्त्यावर नेहमीच्या वाहतूक कोंडीने वाहनचालक, नागरिक हैराण झाले असुन गर्दीमुळे दोन दिवसांपूर्वी सहा महिन्यांच्या बाळाचा अपघाती मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर चर्चा करून उपाययोजना करण्याची मागणी करण्यासाठी रविवारी (दि. २५) शहरातील नागरिक एकत्र आले होते. यावेळी अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शहरातून निषेध फेरी काढुन प्रशासनाचे व अतिक्रमण करणाऱ्या दुकानदार, व्यावसायिकांचे लक्ष वेधले.

हुतात्मा फाउंडेशनचे अमर टाटीया, बाळासाहेब सांडभोर, एड. सुभाष होले, संदीप भोसले, माजी सरपंच मारुती सातकर, शहराचे नगरसेवक मनोहर सांडभोर, राहूल आढारी, मंगेश गुंडाळ, संतोष भांगे, नितीन सैद, राजेंद्र सांडभोर, अविनाश कहाणे, बाळासाहेब कहाणे, कैलास दुधाळे, मिलिंद शिंदे, एड. मनीषा पवळे, बापूसाहेब नगरकर, मोहिंदर थिगळे, अविनाश गावडे, एड. निलेश आंधळे, दिनेश कड, वैभव घुमटकर, अनंत भालेकर, निलोफर मोमीन, बबन शिवले, राजन जांभळे, मनोज सावताडकर, एड. दीपक थिगळे, जयंत घोरपडे, सुनील थिगळे आदी नागरिक व व्यावसायिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

राजगुरुनगर शहरामधे नागरी समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे शहरातून जाणारा मुख्य वाडा रस्ता आणि त्यावरील सततची होणारी वाहतुक कोंडी आहे. नुकताच या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलेला आहे; मात्र दुतर्फा असणारं बेकायदेशीर आणि बेशिस्त पार्किंग, मोठमोठ्या इमारतींचे अतिक्रमण, रस्त्याच्या कडेला व्यवसाय थाटलेले व्यावसायिक आणि बेजबाबदार वाहनचालक या सर्वांमुळे या रस्त्यावर पुणे-नाशिक रस्ता ते संगम गार्डन या भागात सतत, दिवसभर वाहतूक कोंडी असते. वेळोवेळी मागणी करुनही कोणतीही ठोस उपाययोजना यावर होत नसल्याने नागरिक संतप्त झाले होते.

Back to top button