आदित्य ठाकरेंच्या लग्नाचं तुम्हाला काय करायचंय?; तुम्ही काय विवाह संस्था सुरु केली? शिवसेना उपनेत्यांचा हल्लबोल | पुढारी

आदित्य ठाकरेंच्या लग्नाचं तुम्हाला काय करायचंय?; तुम्ही काय विवाह संस्था सुरु केली? शिवसेना उपनेत्यांचा हल्लबोल

पुणे, पुढारी वृत्तसेवा: माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटासोबत असलेल्या रामदास कदम यांच्या या टीकेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उत्तर दिले आहे. कदम यांच्या निष्ठेबद्दल बोलण्याची गरज अजिबात गरज नाही. कारण त्यांची निष्ठा कशी आहे ते सर्वांनी गेल्या काही दिवसांत पाहिली आहे. ते रडता रडता ठाकरे यांच्या बद्दल बोलणार नाही असे बोलले होते. आज ज्या भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. ते ही भाषा कोणत्या दबावात बोलत आहेत, हे विचार करण्याची गरज आहे. रामदास कदमांची ही धडपड केवळ विधान परिषदेच्या जागेसाठी आहे, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे टूनटून उड्यामारुन मी केला, मी केला म्हणून ओरडत आहेत. अरे बाबा तू काय केलं. तू अजून लग्न केलं नाहीस, आता तू काय करणार आहेस?, अशी बोचरी टीका रामदास कदमांनी केली होती. यावर देखील सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. तुम्ही का आदित्य ठाकरेंना लग्न करायला सांगतायं, तुम्ही एखादी विवाह संस्था खोलली आहे? तुम्हाला त्यांच्या लग्नाचं काय करायचं आहे, त्यांचे आई-वडील बघून घेतील. हे सांगणारे तुम्ही कोण ? असा सवाल अंधारे उपस्थित केला. तसेच आदित्य ठाकरे यांच्या लग्नाबद्दल जी भाषा शिंदे गटांकडून वापरली जाते ती भाजपची स्क्रिप्ट आहे.

रामदास कदम यांच्या विरोधात २० सप्टेंबरपासून मराठवाड्यात आंदोलन सुरु करणार असल्याची माहिती अंधारे यांनी यावेळी दिली. ज्या मराठवाड्याचे नेते म्हणून तुम्ही मिरवले आता त्या मराठवाड्यात फिरून दाखवा असे आव्हान देखील त्यांनी रामदास कदम यांना दिले. तसेच येणाऱ्या काळात कोणी ठाकरे परिवार आणि शिवसेना बद्दल बेताल केले तर सेनेकडून आपल्या स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

Back to top button