बारामती : पुढारी वृत्तसेवा : कालवा अस्तरीकरणाच्या विषयावरून बारामतीतील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात आयोजित बैठकीत जोरदार राडा झाला. शेतकरी कृती समिती व कालवा बचाव संघर्ष समितीने या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता. कालवा अस्तरीकरण झालेच पाहिजे, या मताचे शेतकरीही या बैठकीला उपस्थित राहिले. परिणामी दोन गट पडल्याने जोरदार घोषणाबाजी झाली. कोणत्याची चर्चेविना बैठक गुंडाळण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली.
दरम्यान कालव्याच्या अस्तरीकरणाला मोठा विरोध होत असताना जलसंपदा विभागाच्याच अधिकाऱ्यानी अस्तरीकरण झाले पाहिजे, या मताचे शेतकरी या बैठकीला बोलावल्याचा आरोप कालवा बचाव संघर्ष समितीने केला. सुरुवातीला कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणासंदर्भात शासनाची भूमिका मांडली. त्यानंतर काही वेळातच अस्तरीकरण व्हायला हवे, या मताचे शेतकरी तेथे आल्याने गोंधळाला सुरुवात झाली. या गोंधळात अस्तरीकरण नको, अस्तरीकरण झालेच पाहिजे, या परस्पर विरोधी घोषणा देण्यात येवू लागल्या.
शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, मदन काकडे, राष्ट्रवादीचे माजी युवकाध्य़क्ष किरण तावरे, मदनराव देवकाते यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जेथे विरोध असेल तेथे कालवा अस्तरीकरण होणार नाही, असे जाहीर केले असताना बैठक का बोलावली, असा सवाल अस्तरीकरण व्हावे या मताच्या शेतकऱ्यानी मांडला. तर शेतकर्यांच्या शंकांचे निरसन झालेच पाहिजे, अस्तरीकरणामुळे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार असून या विषयाला कायम विरोध करू, अशी भूमिका अस्तरीकरण नको म्हणणाऱ्या शेतकऱयांनी घेतली. या सगळ्या गोंधळामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱयांना घाम फुटला.
बैठकीत राडा सुरु झाल्याने शहर पोलिसांनी तात्काळ विश्रामगृहाकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू देवू नका, असे आवाहन केले. शिवाय प्रत्येकाला मते मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे लोकशाही मार्गाने स्वतंत्रपणे भूमिका मांडा, असे मत व्यक्त केले. बैठकीतील गोंधळ वाढत असल्याचे पाहुन ती संपवावी, असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार बैठक संपविण्यात आली.
दरम्यान यासंबंधी नव्याने बैठक बोलावली जाणार असल्याचे सतीश काकडे यांनी सांगितले.