खडकवासला धरणातून 13 हजार 981 क्युसेक विसर्ग; धरणक्षेत्रात रिमझिमनंतर सरीवर सरी | पुढारी

खडकवासला धरणातून 13 हजार 981 क्युसेक विसर्ग; धरणक्षेत्रात रिमझिमनंतर सरीवर सरी

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पानशेत मुठा खोर्‍यात बुधवारी (दि. 14) पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणक्षेत्रात रिमझिमीनंतर अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. सर्व चारही धरणांत पाण्याची आवक सुरूच आहे. सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात 13 हजार 971 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात होते. खडकवासला साखळी धरण 100 टक्के भरून वाहत आहेत. दिवस अखेर साखळीत 29.15 टीएमसी म्हणजे 100 टक्के पाणीसाठा होता.

पानशेत, वरसगाव, मुठा खोर्‍यातील ओढे, नाले, नद्यांतून पाण्याचे प्रवाह आहे. धरणांतील पाण्याची आवक कायम आहे. टेमघर, पानशेत व वरसगाव धरणातून सोडण्यात येत असलेल्या व धरण क्षेत्रातील पाण्याची आवक वाढल्याने खडकवासलाच्या विसर्गात टप्पाटप्प्याने वाढ करण्यात आली. धरण क्षेत्रापेक्षा डोंगरी पट्ट्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे.

टेमघर धरण यंदाच्या हंगामात दुसर्‍यांदा 100 टक्के भरले आहे. पावसामुळे धरणात येणारे जादा पाणी सोडण्यात येत आहे.
बुधवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पानशेत येथे 12, वरसगाव येथे 13, टेमघर येथे 25 व खडकवासला येथे 5 मिलिमीटर पाऊस पडला.

संततधारेमुळे धरणातील पाण्याची आवक वाढल्याने पानशेतमधून वीजनिर्मिती व वांजळवाडी सांडव्यातून 4 हजार 558 क्युसेक विसर्ग सुरू आहे. वरसगावच्या दोन्ही सांडव्यांतून 6 हजार 110 क्सुसेक व टेमघरमधून 370 विसर्ग सुरू आहे. या पाण्याची भर पडत असल्याने खडकवासलातून जादा पाणी सोडले जात आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास खडकवासलातून मुठा नदीच्या पात्रात जादा पाणी सोडले जाणार आहे.

                                                             – योगेश भंडलकर,
                                      उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

Back to top button