पुणे : जिल्ह्यातील 317 गावांमध्ये अजूनही स्मशानभूमी नाही. या गावांमध्ये सध्या अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांना इतर जागांचा आधार घ्यावा लागत आहे. गावकर्यांकडून सतत स्मशानभूमीची मागणीदेखील करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने 317 गावांमध्ये स्मशानभूमीच्या निधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) प्रस्ताव पाठवल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलवडे यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये एक हजार 386 ग्रामपंचायती असून, एक हजार 844 महसुली गावे आहेत. त्यापैकी 317 गावांना स्मशानभूमी नसल्याने ऐन पावसाळ्यात एखाद्याचा मृत्यू झाला, तर अंतिम संस्कार कसा करायचा, असा प्रश्न निर्माण होतो. अनेक ठिकाणी स्मशानभूमी आहे, तर त्यावर शेडही नाही. स्मशानभूमी नसल्याने उघड्या जागेवर, नदीकाठावर अथवा रस्त्याच्या कडेला अंतिम संस्कार करण्याची वेळ येते. जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात स्मशानभूमीची सर्वाधिक मागणी आहे. या तालुक्यात 56 गावांमध्ये स्मशानभूमीची गरज आहे. त्या पाठोपाठ जुन्नर 39,खेड 38 चा नंबर लागतो.
दरम्यान, जिल्ह्यातील अशा 317 गावांमध्ये स्मशानभूमी व्हावी यासाठी लागणार्या निधीबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवला आहे. सुमारे 31 कोटी 70 लाखांची एवढ्या निधीची आवश्यकता असल्याचे नलवडे यांनी सांगितले.
आंबेगाव 54, बारामती 5, भोर 36, दौंड 5, हवेली 14, इंदापूर 12, जुन्नर 39, खेड 38, मावळ 27, मुळशी 26, पुरंदर 13, शिरूर 25, वेल्हे 23.