पुणे : परीक्षा मंडळांच्या संयमाचीच..! निर्बंधमुक्त मिरवणुकीत उठवले पथकांच्या आणि वादकांच्या संख्येचे बंधन | पुढारी

पुणे : परीक्षा मंडळांच्या संयमाचीच..! निर्बंधमुक्त मिरवणुकीत उठवले पथकांच्या आणि वादकांच्या संख्येचे बंधन

शंकर कवडे
पुणे : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांप्रमाणेच यंदा विसर्जन मिरवणूकही निर्बंधमुक्त असल्याने मोठ्या मंडळांमधील पथकांची संख्या किती वाढणार, त्यातील ढोल-ताशा-वादकांची संख्या किती होणार याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी मिरवणूक वेळेत संपवण्याचा दरवर्षी केला जाणारा निर्धार प्रत्यक्षात आणणे हे मंडळांच्या स्वयंशिस्तीवर अवलंबून राहणार असल्याने त्यांच्या संयमाचीच परीक्षा होणार आहे.

मिरवणुकीतील मंडळांपुढे पथकांच्या संख्येचे बंधन नसल्याने पूर्वी अनेक पथके गणपतीपुढे ठेवण्यात येत. पथकामधील ढोलांची संख्या शंभरपर्यंतही जाऊ लागली. त्यामुळे यापूर्वी पोलिस व महापालिका प्रशासनाकडून प्रत्येक पथकामध्ये 40 ढोल व दहा ताशे असलेल्या दोन पथकांचा समावेश करण्याचा नियम करण्यात आला, तर मानाच्या मंडळांना तीन पथके लावण्याची परवानगी देण्यात आली.
यंदा पोलिस प्रशासनाने ढोल-ताशा पथक व वादकांच्या संख्येवरील निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला.

याची आधीच कल्पना आल्याने प्रमुख मंडळांनी पथकांना बुक केले होते. त्यानंतर पथकांकडे वादकांची संख्या वाढविण्याकडे मंडळाची मागणी होऊ लागली आहे. मोठ्या मंडळांनी पथकांची आणि ढोल-ताशांची संख्या वाढवली तर मिरवणुकीचा आकार वाढेल. त्यामुळे मिरवणुकीला लागणारा वेळ खूपच वाढू शकेल. म्हणूनच यंदाची निर्बंधमुक्त मिरवणूक अवाजवीरीत्या न लांबण्याची खबरदारी मंडळांनाच घ्यावी लागणार आहे. मोठ्या मंडळांच्या प्रमुखांच्या संयमाची ही परीक्षा ठरणार असल्याचे मत जाणकारांनी ‘पुढारी’कडे व्यक्त केले.

वर्ष विसर्जनाचा कालावधी
2012 28 तास 50 मिनिटे
2014 29 तास 12 मिनिटे
2015 28 तास 55 मिनिट
2016 28 तास 30 मिनिटे
2019 24 तास 00 मिनिटे

…अन्यथा मिरवणूक रेंगाळणार
विसर्जन मिरवणुकीचा वेळ कमी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी थांबून बर्‍याच वेळ वादनाचे आवर्तन करण्यावर मंडळ तसेच पोलिस प्रशासनाने कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. यापूर्वी किती चौकात थांबून वादन करावे याचेही निर्बंध होते. मात्र, विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्त्यावरील प्रत्येक चौकात थांबून आवर्तन केल्यास त्याचा परिणाम मिरवणूक रेंगाळण्यावर होईल. निर्बंध नसले तरी मंडळांना वास्तवाचे भान जपून विसर्जन सोहळा पार पाडावा लागणार आहे.

शहरातील गणपती मंडळांची संख्या
4 हजार 500
शहरातील पथकांची संख्या
125 ते 130

पथक लावणार्‍यांची संख्या
दहा मंडळांमागे
दोन मंडळे

डीजे तसेच अन्य मार्गांचा अवलंब
दहा मंडळांमागे
सात ते आठ

जिल्ह्यातील पथकांची संख्या
45 ते 50

दगडूशेठ गणपती मंडळाने स्वत:ला स्वयंशिस्तीचे बंधन घातले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून विसर्जन मिरवणुकीतील ढोल पथकांसदर्भातील निर्बंध उठविण्यात आले असले तरी मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणेच विसर्जन मिरवणूक पार पडेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणुकीत स्वरूपवर्धिनीचे ढोल पथक सहभागी होणार आहे.

                                                     – महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष,
                                  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट

विसर्जन मिरवणुकीसंदर्भात अद्याप नियोजन केले नाही. विसर्जनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये ढोल-पथकांबाबत निर्णय घेण्यात येईल. पोलिसांची विसर्जनासंदर्भात नियमावली जाहीर झाल्यानंतर पुढील रुपरेषा ठरविण्यात येईल.

                                                              – पृथ्वीराज परदेशी,
                                                        उत्सव प्रमुख, गुरुजी तालीम मंडळ

दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणुकीत गजलक्ष्मी, रुद्रगर्जना व शिवतेज ही तीन पथके सहभागी होतील. वादकांची संख्याही नेहमीप्रमाणेच राहील. दोन वर्षानंतर उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असला तरी पूर्वीप्रमाणेच विसर्जन मिरवणूक पार पडेल.

                                                              – बाळासाहेब मारणे,                                                                                 अध्यक्ष, हुतात्मा बाबू गेनू मंडळ (ट्रस्ट)

शहरातील मंडळांच्या तुलनेत पथकांची
संख्या खूपच कमी आहे. पारंपरिक असलेल्या ढोल-ताशा पथकांवरील निर्बंध हटल्याने त्याचा फायदा ठरावीक मंडळांना होईल. शहरातील महत्त्वाच्या मंडळांमध्ये पथकांची संख्या वाढेल तर काही ठिकाणी वादकांची संख्या वाढेल. शहरातील प्रत्येक मंडळाला ढोल-ताशा पथके हवी असतात. मात्र, बहुतांश मंडळांना ते आर्थिकदृष्टया परवडत नाही.

                                                                       – पराग ठाकूर,                                                                                                अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघ

साडेतीन हजारांहून अधिक रुग्णांची ससूनला रवानगी; कमला नेहरू रुग्णालयात सुविधा नसल्याचा परिणाम गणेशोत्सवात प्रामुख्याने शेवटचे पाच दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी द्यावी, अशी आमची मागणी होती. दि. 3 ऐवजी 7 सप्टेंबरला परवानगीची आवश्यकता असताना ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे 9 व्या दिवशी परवानगी मिळावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गणेश मंडळांच्या वतीने करणार आहोत.

                                                               – अजय भोसले,                                                                                          सह संपर्क प्रमुख शिवसेना (शिंदे गट)

Back to top button