पुणे : ठेकेदारांना कामे उरकण्याची घाई
पुणे; पुढारी वृत्तसेवा: सध्या जिल्हा परिषदेअंतर्गत होणार्या विविध कामांना गती आली आहे. एरवी मुदत संपल्यानंतरही कामे पूर्ण न करणार्या ठेकेदारांना कामे पूर्ण करण्याची घाई झाली आहे. सध्याच्या प्रशासक कालावधीत काम पूर्ण होऊन आपले बिल निघण्यासाठी ही सर्व घाई सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात सरकार बदलल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामांचा वेग मंदावला होता. काही कामे रद्द ही करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकानंतर नव्या पदाधिकारी आल्यानंतर ठेकेदारांच्या बिलांना विलंब ही होऊ शकतो, असेही एक कारण सांगण्यात येते. कामे तत्काळ पूर्ण करून त्याचा पूर्णत्वाचा दाखला घेऊन कामाचे बिल जिल्हा परिषदेतून घेण्यासाठी सर्वच ठेकेदारांनी आपआपल्या कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. यासंदर्भात ठेकेदारांची बैठकदेखील नुकतीच जिल्हा परिषदेत पार पडली.