…..अन्यथा कालव्यात बायका पोरासह जलसमाधी घेऊ! गोतोंडीतील शेतकऱ्यांचा सरकारला इशारा | पुढारी

.....अन्यथा कालव्यात बायका पोरासह जलसमाधी घेऊ! गोतोंडीतील शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

शेळगाव, पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यात निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण झाल्यास शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत येणार असून शेतकरी देशोधडीला लागतील म्हणून आमचा अस्तरीकरणाला विरोध असून देखील काम सुरू ठेवले तर आम्ही बायका पोरासह निराडावा कालव्यात सामूहिक जलसमाधी घेऊ असा इशारा गोतोंडी (ता.इंदापूर) येथील शेतकऱ्यांनी व महिलांनी सरकारला दिला आहे. तातडीने अस्तरीकरणाचे काम बंद करावे अशी मागणी देखील केली.

सोमवार (दि।29) इंदापूर -बारामती संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील गोतोंडी येथे सर्व पक्षाच्या तसेच शेतकऱ्यांच्या व महिलांच्या वतीने कालव्याच्या अस्तरीकरणाच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन केले होते. यावेळेस आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

यावेळी सरपंच गुरुनाथ नलवडे,कर्मयोगी माजी संचालक दिनकर नलवडे,आप्पा पाटील,लक्ष्मण कांबळे,प्रहार संघटनेचे कुंडलिक नलवडे,माजी कृषी अधिकारी विठ्ठल पापत यांनी अस्तरीकरण झाल्यास आधीच शेती व्यवसाय अडचणीत आहे त्यात भर पडेलशिवाय कालव्याच्या नजीक वन विभाग असून वन्यप्राण्यांचे देखील पाण्यावाचुन हाल होणार आहेत.शिवाय पाणी टंचाई निर्माण होईल तसेच कालवा शेतकऱ्यांच्याच मालकीचा आहे. कारण आजरोजी देखील सात बारा उतारावर कालव्याचे क्षेत्र आरक्षित झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करू नका असे मत व्यक्त केले.

यावेळी शासनाच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे,मंडल अधिकारी शहाजी राखुंडे,जलसंपदा विभागाचे रतनकुमार झगडे,हनुमंत ननवरे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी उपसरपंच परशुराम जाधव , कर्मयोगीच्या संचालिका कांचन अशोक कदम व अशोक कदम शिवाजी बनकर,गुरूनाथ पाटील,रामभाऊ काळे,काशीनाथ शेटे,किशोर कांबळे,संजय बिबे,गजराबाइ जाधव,सुवर्णा कांबळे,पोलिस पाटील राजश्री हरीभाऊ खाडे,तलाठी प्रशांत कांबळे मोठ्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होते.
आंदोलनानंतर वालचंदनगर पोलिसांनी वाहतूक सुरळीतपणे सुरू केली.

आंदोलकांचे निवेदन स्वीकारताना अधिकारी

Back to top button