विशेष फेरीत प्रवेशासाठी मुदतवाढ; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय | पुढारी

विशेष फेरीत प्रवेशासाठी मुदतवाढ; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, अमरावती, नाशिक, नागपूर या विभागांतील केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 2 ऐवजी 9 सप्टेंबरपर्यंत या फेरीतून प्रवेश घेता येणार आहे. गणेशोत्सवातील सुट्यांच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला असून, त्यासंदर्भातील सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

विशेष फेरीसंदर्भात यापूर्वीच माध्यमिक विभागाने एक वेळापत्रक जाहीर केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना 27 ऑगस्टपर्यंत नव्याने अर्ज भरण्याची आणि अर्जाच्या भाग दोनमध्ये बदल करण्याची संधी होती. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 29 ऑगस्टपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्जांमध्ये बदल करता येणार आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 30 ऑगस्टला कॉलेजचे कट ऑफ आणि प्रवेश जाहीर केले जाणार होते.

आता 2 सप्टेंबरला कट ऑफ जाहीर होतील. 9 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येतील. गणेशोत्सवामुळे सुट्यांचे दिवस आले आहेत. त्यामुळे केवळ दोन दिवस प्रवेशासाठी दिले असते तर विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले असते. आता सहा दिवस विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.‘विद्यार्थ्यांनी वेळ न दवडता तातडीने प्रवेश घ्यावेत,’ असे आवाहन माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी केले आहे.

प्रवेश रद्दसाठी केवळ 200 रुपये घ्यावेत…
सध्या अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थी संपूर्ण फी भरून प्रवेश निश्चित करतात. परंतु काही विद्यार्थी मिळालेला प्रवेश काही कारणास्तव रद्द करतात. असे प्रवेश रद्द करताना विद्यार्थ्यांनी जर संबंधित महाविद्यालयातील फी भरलेली असेल तर प्रवेश रद्द करताना केवळ दोनशे रुपये शुल्क कमी करून उर्वरित संपूर्ण फी विद्यार्थ्याला परत करावी. महाविद्यालयाच्या फी व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येऊ नये. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना कोणत्याही प्रकारचे साहित्य महाविद्यालयातून खरेदी करण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत

Back to top button