खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग बंद, पाणलोट क्षेत्र परिसरात पावसाची विश्रांती; साखळीत 29.15 टीएमसी पाणीसाठा | पुढारी

खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग बंद, पाणलोट क्षेत्र परिसरात पावसाची विश्रांती; साखळीत 29.15 टीएमसी पाणीसाठा

खडकवासला, पुढारी वृत्तसेवा: गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी खडकवासला धरण साखळीत विश्रांती घेतली. त्यामुळे दुपारी तीन वाजता खडकवासला धरणातून सुरू असलेला मुठा नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. पानशेत, वरसगाव खोर्‍यात, सिंहगड भागात सकाळपासून पावसाची उघडीप होती. डोंगरी पट्ट्यात ढगाळ वातावरण व ऊन पडले होते.

पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चारही धरण माथ्यावर दिवसभरात एक मिलिमीटरही पावसाची नोंद झाली नाही. परिणामी, खडकवासला धरणातील पाण्याची आवकही कमी झाली आहे. सध्या खडकवासलातून मुठा कालव्यात 1005 क्युसेक, तसेच पिण्यासाठी पाणी सोडले जात आहे. सकाळपासून टप्प्याटप्प्याने खडकवासला धरणातील विसर्गात कपात करण्यात आली. एक महिना उशिरा पाऊस सुरू होऊनही 1 जुलैपासून काही अपवाद वगळता धरणसाखळीत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे दीड महिन्यात खडकवासलातून सुमारे 21 टीएमसी जादा पाणी सोडण्यात आले. धरण साखळीतील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. पावसाने विश्रांती घेतल्याने मुठा नदीतील जादा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. असे असले तरी धरण क्षेत्रात पाऊस पडल्यास जादा पाणी सोडण्यात येत आहे, असे खडकवासला जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

पानशेतमधून 500 व टेमघरमधून 720 क्सुसेक पाणी सोडले जात आहे. पाणी सोडूनही दोन्ही धरणांतील पातळी शंभर टक्क्यांपर्यंत आहे. दोन्ही धरणांतील पाण्याची भर खडकवासलात पडत आहे. त्यामुळे शेती व पिण्यासाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडूनही खडकवासला तुडुंब भरले आहे. खडकवासला धरण साखळीत सध्या 29.15 टीएमसी (100 टक्के) पाणीसाठा झाला आहे.

Back to top button