

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 या कालावधीत पूर्णत: कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. लाभाची रक्कम पात्र शेतकर्यांच्या बचत खात्यात जमा होणार असून, शेतकर्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करावे,' असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.bशेतकर्यांनी या तीन वर्षांत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची बँकेच्या मंजूर धोरणानुसार विहित मुदतीत परतफेड केली आहे, अशा शेतकर्यांना त्यांनी या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ देण्यात येणार आहे.
शेतकर्यांनी घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 2018-19 अथवा 2019-20 या वर्षात 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकर्यांना त्यांनी प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. शेतकर्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी बचत खात्याला आधार क्रमांक जोडणी आवश्यक आहे. आधार कार्ड नाहीत अशा पात्र शेतकर्यांनी तत्काळ 'आपले सरकार सेवा' केंद्रात जाऊन आधार कार्ड काढावे व ते आपल्या बँकेच्या बचत खात्यास जोडणी करावे तसेच आधार कार्ड बचत खात्यास जोडलेले नाही त्यांनीही बँकेच्या शाखेत संपर्क साधून आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करावी, असे आवाहन पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मिलिंद सोबले यांनी केले आहे.