खडकवासलातून 15 टीएमसी पाणी सोडले | पुढारी

खडकवासलातून 15 टीएमसी पाणी सोडले

वेल्हे : शहर व जिल्ह्यातील लक्षावधी नागरिकांची व हजारो हेक्टर शेतीची तहान भागविणार्‍या खडकवासला धरण साखळीत यंदा एक महिना उशिरा पाऊस सुरू होऊनही गेल्या महिनाभरात खडकवासला धरणातून तब्बल 15 टीएमसी जादा पाणी सोडण्यात आले. सर्व धरणे शंभर टक्के भरल्याने धरणातून जादा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चार धरणांच्या खडकवासला साखळीची पाणी साठवण क्षमता 29.15 टीएमसी इतकी आहे. त्यापेक्षा पन्नास टक्के अधिक पाणी यंदाच्या हंगामात धरण साखळीत जमा झाले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरण साखळीत जेमतेम 3 टीएमसी पाणी होते.

टेमघर येथे 1 जूनपासून 19 ऑगस्टपर्यंत विक्रमी 2847 मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत, वरसगाव येथेही पावसाने सरासरी ओलांडली आहे. पुणे शहर व परिसराला वर्षभर पुरेल इतके 15 टीएमसी जादा पाणी आतापर्यंत खडकवासलातून सोडण्यात आले आहे. यातील 11.08 टीएमसी पाणी धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात आले. या पाण्याचा लाभ उजनी धरण व लाभक्षेत्राला झाला, तर मुठा कालव्यातून 4 टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्याचा लाभ हवेली दौंड इंदापूर आदी तालुक्यातील शेतकर्‍यांना झाला आहे. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर म्हणाले, धरणे भरल्याने खडकवासलातून अतिरिक्त पाणी मुठानदी व मुठा कालव्यात सोडण्यात येत आहे. जुलैपासून सर्व धरण क्षेत्रांत पाऊस पडत आहे. धरणांच्या क्षमतेपेक्षा येणारे जादा पाणी सोडून धरणातील पाणीपातळी शंभर टक्के ठेवण्यात
येत आहे.

Back to top button