जैन स्थानक भोसरी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा | पुढारी

जैन स्थानक भोसरी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : देश देव धर्म ही आपल्या जीवनातील अविभाज्य अंग आहेत. या तिन्हींचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना प्रत्येक भारतीयांनी हा सण आनंदाचा समजून साजरा केला पाहिजे, असे प्रतिपादन जैन साध्वी दिवाकर रश्मि डॉ. पू. श्री सुशीलजी महाराजसाहब यांनी भोसरी जैन श्रावक संघ आयोजित चातुर्मास प्रवचनातील झेंडावंदन कार्यक्रमात व्यक्त केले.

याप्रसंगी श्री जैन श्रावक संघाचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सागर साखला कचरदास गांधी, सुभाषमामा चुत्तर, मदन भाऊ कर्नावट खुशाल बोरा पोपटलाल बाफना, मदनला चोरडिया, सुरेश सोळंकी, राहुल गुंदेचा, मनोज गांधी, अमृतलाल गुंदेचा, अशोक बोरा, अशोक कुमार चोपडा, अरुण पारख,रवींद्र मुथियान विजय पारख आदी उपस्थित होते

डॉ. सुशीलजी महाराजसाहब, म्हणाल्या कि, घरोघरी तिरंगा ही वेगळी संकल्पना देशात प्रथमच राबविली आहे. १५ऑगस्ट हा शासकिय सण न होता तो घराघरात पोहोचला पाहिजे. हा आनंद प्रत्येक भारतीयाला निश्चित अभिमानास्पद आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी लाखो स्वातंत्र्यवीरांना आपल्या रक्ताचा अभिषेक या मातृभूमीसाठी करावा लागला या क्रांतिकारकांच्या रक्ताने माखलेल्या या मातृभूमीची माती तिलक म्हणून कपाळी लावली पाहिजे. हा टिळा आपला स्वाभिमान आहे!

तपमूर्ती स्नेहलता धाकड यांच्या 19 उपवास व सौ. शालिनी धाकड यांच्या 33 एकासना तपस्या निमित्त श्री संघातर्फे अनुमोदना देऊन शासन देवीच्या चरणी तपस्या सुखसातपूर्वक संपन्न व्हावी अशी प्रार्थना करण्यात आली. भारत मातेचा वेश परिधान करून. तन्वी शाळ या चिमुकलीने स्वातंत्र्य देवीचे मनोगत व्यक्त केले. गायिका साध्वी पू. श्रद्धाजी महाराजसाहब यांनी ए मेरे वतन के लोगो हे देशभक्ती पर गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष राजेंद्र चोरडिया यांनी केले त्यास ऋषी जैन यांनी सहकार्य केले….

Back to top button