जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेल्या नाझरे (मल्हार सागर) धरण परिसरात गेल्या जून महिन्यापासून आतापर्यंत केवळ 343 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, कर्हा नदी वाहू लागल्यामुळे या धरणातील पाणीसाठ्यात गेली सात दिवसांत 30 टक्के वाढ झाली आहे. धरणात सध्या 40 टक्के पाणीसाठा झाला आहे. नाझरे धरणाची एकूण क्षमता 788 दशलक्ष घनफूट इतकी असून या जलाशयात शनिवारपर्यंत 423 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला आहे.
15 ऑगस्ट 2020 रोजी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. गेल्या वर्षी (2021) कमी पाऊस झाल्याने धरण केवळ 50 टक्के भरले होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा मृतसाठ्याच्या खाली गेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी सुमारे 56 गावांवर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले होते. मात्र, गेल्या चार- पाच दिवसांत परिसरात दमदार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या 30 जुलै रोजी धरणात केवळ 10 टक्के पाणीसाठा झाला होता. तर आता हा साठा 40 टक्के झाला आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असणार्या 56 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुरंदरमध्ये 423 मि. मी. पावसाची नोंद
पावसाळ्याचे अजून ऑगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने बाकी आहेत. तसेच परतीच्या पावसाकडूनही अपेक्षा आहेत. या काळात चांगला पाऊस झाला, तर हे धरणे पूर्ण क्षमतेने भरणार आहे. पुरंदर तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 496 मिलिमीटर असून आतापर्यंत 423 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.