पवन मावळात भात लागवडीची लगबग
तळेगाव दाभाडे : पवन मावळात सगुणा राइस तंत्र (एस.आर.टी.) पद्धतीने भात लागवड करण्याची लगबग दिसून येत आहे. शिलिंब, तुंग, चावसर, मोरवे, अजीवली, काले, पुसाणे, दारूब्रे, वारू, करूंज आदी गावांमधे एसआरटी पद्धतीने लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पवन मावळमधील गावांमध्ये शेतकर्यांनी या वर्षी 100 हेक्टर क्षेत्रावर एस.आर.टी. पद्धतीने लागवड पूर्ण झाल्याचे मंडळ कृषी अधिकारी दत्ता शेटे व कृषी पर्यवेक्षक नागनाथ शिंदे, नंदकुमार साबळे यांनी सांगितले.
पवन मावळात पोषक वातावरण चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकर्यांनी एस.आर.टी. पद्धतीने लागवडी पूर्ण केल्या आहेत. या पद्धतीमध्ये उत्पादन जास्त मिळत असल्याने व आवणी/लावणीचे कष्ट वाचल्यामुळे 50 टक्के शेतकर्यांचा त्रास कमी होतो. या पद्धतीमध्ये जुन्या पिकाची मूळे वाफ्यामध्येच ठेवल्यामुळे मुळांची जाळी तयार होते, असे शिलिंब गावचे कृषी सहायक विकास गोसावी, कृषीमित्र लहू दत्तू धनवे, मोरवे गावचे प्रगतशील शेतकरी रोहिदास कडू यांनी सांगितले.