भीमाशंकर : भाविकांना जावे लागते उघड्यावर शौचास, मंदिराजवळील शौचालय अर्धवट | पुढारी

भीमाशंकर : भाविकांना जावे लागते उघड्यावर शौचास, मंदिराजवळील शौचालय अर्धवट

अशोक शेंगाळे :
भीमाशंकर : श्री क्षेत्र भीमाशंकरला भाविकांच्या व स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी केलेल्या मागणीवरून माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून पोलिस ठाणे व प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे. सुसज्ज भक्तनिवास, तसेच बसस्थानक परिसरात जिल्हा परिषदेचे सुलभ शौचालयदेखील आहे. मात्र, पुरेसे पाणी नसल्याने येथे अस्वच्छता आहे. तर, मंदिराजवळील शौचालय अर्धवट बंद अवस्थेत असल्याने यात महिलावर्गाची मोठी कुचंबना होत असल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकरला पर्यटक व भाविकांची बाराही महिने गर्दी असते. येथे भीमाशंकर अभयारण्य असल्यामुळे येथे निसर्गप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. येथे पोलिस ठाणे व आरोग्य पथक होण्याची मागणी वारंवार होत होती. गेल्या वर्षी बसस्थानकाजवळ पोलिस ठाण्याचे उद्घाटन झाले. परंतु, येथील कर्मचारी उपस्थित नसल्याने येथील पोलिस ठाणे कायमच बंद असते. यामुळे हौशी पर्यटक दारू पिऊन धिंगाणा घालतात. यातच भक्त-भाविकांंचा ओघ वाढला आहे. चारचाकी वाहन, एसटी व खासगी बस यांंची मोठी गर्दी होत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होते. तर, छोटे अपघातही होत आहेत.

त्यांना आवर घालण्यासाठी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्यास येथे कुलूप असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन सुरक्षेची बाब गंभीर उघड होत आहे. दरम्यान, घोडेगाव ते भीमाशंकर हे 45 किलोमीटरचे अंतर असून, येथे काही अनुचित प्रकार घडल्यास अथवा अपघात घडल्यास घटनास्थळी येण्यास पोलिस ठाणे घोडेगावला असल्याने सुमारे एक ते दीड तास लागतो. यामुळे अपघातग्रस्तांना मदत मिळण्यास विलंब होतो. भीमाशंकर येथे खेड, आंबेगाव तालुक्यांच्या सीमारेषा असल्याने अभयारण्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास खेड पोलिसांना सुमारे 55 ते 60 किलोमीटरवरून, तर घोडेगावला सुमारे 45 किलोमीटरवरून घटनास्थळी यावे लागते.

शौचालयाचे लाखो रुपये वाया
नुकतेच जिल्हा परिषदेमार्फत बसस्थानकात सुलभ शौचालय बांधण्यात आले असून, हे सध्या घाणीच्या विळख्यात आहे. मंदिराजवळील शौचालय अर्धवट बंद अवस्थेत असल्याने महिलावर्गाची मोठी कुचंबना होत असल्याने त्यांना उघड्यावर शौचालयास जावे लागत आहे. यामुळे या ठिकाणी गैरसोय होत आहे. लाखो रूपये खर्च करून हे वाया गेल्याचे पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत नाही. राजपूर जवळील बांधण्यात आलेले सुसज्ज भक्तनिवास उभे राहिले आहे. येथे फार कमी प्रवासी असतात. यातच बसस्थानकाजवळील एम.टी डी.सी.चे भक्तनिवास नादुरुस्त व नियोजन नसल्याने भक्त-भाविकांना खासगी हॉटेलचा आसरा घ्यावा लागत आहे.

दोन्ही पोलिस ठाण्यातच्या कर्मचा-यांना दूरवरून यावे लागते. त्यात पोलिस ठाणे हद्दीच्या वादाला सुरूवात होऊन प्रत्यक्ष कारवाईला वेळ लागतो. यासाठी भीमाशंकर येथे घोडेगाव किंवा खेड पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिस ठाणे न करता विशेष पोलिस ठाण्याची मंजुरी मिळून एक सहायक पोलिस निरीक्षक व सुमारे दहा कर्मचार्‍यांची कायमस्वरूपी नेमणूक करणे गरजेचे आहे. सध्या एकच पोलिस निरीक्षक असून, अधूनमधून एखादे दोन पोलिस दिले जातात. (समाप्त)

 

Back to top button