पुणे : घनकचरा प्रकल्प 15 ऑगस्टपर्यंत करा; जि.प.ची 311 ग्रामपंचायतींना नोटीस | पुढारी

पुणे : घनकचरा प्रकल्प 15 ऑगस्टपर्यंत करा; जि.प.ची 311 ग्रामपंचायतींना नोटीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा: घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प वेळेत पूर्ण न करणार्‍या 311 गावांमधील सरपंच, ग्रामसेवकांना नोटिसा दिल्या आहेत. या नोटिसांव्दारे उर्वरित कामे 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काम अपूर्ण राहिल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून तातडीने प्रकल्प पूर्ण करण्यास सांगितले आहे. ग्रामीण भागात कचर्‍याची समस्या मोठी असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.

गावात उघड्यावर कचरा टाकल्याने दुर्गंधी पसरते, कचर्‍याचे ढिगारे आजारांसाठी निमंत्रण ठरतात. हा कचर्‍याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला. घनकचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी गावोगावी जनजागृती केली. जिल्ह्यातील 1 हजार 328 घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 421 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. अद्याप 311 ठिकाणी कामे सुरू असून, अद्याप ती अपूर्ण आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत.

सर्वांत कमी कामे बारामतीत
घनकचरा प्रकल्पाचे सर्वांत कमी काम हे बारामती तालुक्यात झाले आहे. या तालुक्यात केवळ 9 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर, सर्वाधिक कामे ही आंबेगाव तालुक्यात (80 टक्के) पूर्ण झाली आहेत. जुन्नरमध्ये 73 टक्के, मुळशीमध्ये 53 टक्के, मावळमध्ये 37 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. सर्वाधिक प्रकल्प हे भोर तालुक्यात आहेत.

Back to top button