पिंपरी : रस्त्यांवर जमा झालेल्या पाण्यामुळे वाहनचालकांची गैरसोय; जनसंवाद सभेत नागरिकांच्या तक्रारी | पुढारी

पिंपरी : रस्त्यांवर जमा झालेल्या पाण्यामुळे वाहनचालकांची गैरसोय; जनसंवाद सभेत नागरिकांच्या तक्रारी

पिंपरी : शहरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी जमा होऊन डबकी तयार होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. खड्डे लक्षात येत नसल्याने त्यामुळे लहान-मोठे अघपात होत आहेत. वाहनाचालकांवर विशेषत: दुचाकीस्वारांवर व पादचार्‍यांच्या अंगावर घाणी पाणी उडते, अशा तक्रारी सोमवारी (दि.25) झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी केल्या.सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या सभेत एकूण 89 नागरिकांनी 125 पेक्षा अधिक तक्रारी केल्या. रस्त्यांवर पावसाचे पाणी जमा होणार नाही. पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी, अशी तक्रार नागरिकांनी केली.

रस्त्यावरील गतिरोधक नजरेस पडावेत यासाठी त्यावर पांढरे पट्टे मारण्यात यावेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत. ड्रेनेज लाईनची कामे करावी. मोकाट व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. वृक्षारोपण करण्यास जागा उपलब्ध करून द्यावी, या तक्रारी नागरिकांनी केल्या. पाणीपुरवठा स्वच्छ व योग्य दाबाने करावा. अनधिकृत बांधकामांवर तसेच, रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी. अनधिकृत पत्राशेड हटवावे. अनधिकृतपणे ड्रेनेज वाहिन्यांना जोडणी केलेल्या मिळकतधारकांवर कारवाई करावी. नागरिकांना रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने पदपथ व दुकानांसमोरील अतिक्रमणे हटवावी. रस्ता रुंदीकरण करावे. रस्त्यावरील पार्किंगच्या ठिकाणी कायमस्वरूपी लावण्यात आलेली वाहने हटवावीत, अशा तक्रारी नागरिकांनी मांडल्या.

सभेचे अध्यक्षपद अनुक्रमे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, उपायुक्त अजय चारठाणकर, सहशहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले. कासारवाडीतील ह क्षेत्रीय कार्यालयाच्या सभेला अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ उपस्थित होते.

तीन दिवस तिरंगा झेंडा लावा

‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करावा. ऑगस्ट महिन्यातील 13 ते 15, असे तीन दिवस घरावर तिरंगा फडकावण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन जनसंवाद सभेत करण्यात आले.

 

Back to top button