राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम : असाध्य आजारांवर ‘आरबीएसके’ची मात्रा | पुढारी

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम : असाध्य आजारांवर ‘आरबीएसके’ची मात्रा

प्रज्ञा केळकर-सिंग : पुणे : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार केले जात असल्याने 0 ते 18 वर्षे वयोगटातील अनेक मुलांना नवसंजीवनी मिळाली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये 75 शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत.

कॅन्सर, हृदय, किडनी आदींशी संबंधित गुंतागुंतींचे आजार असलेल्या मुलांना उपचार मिळावेत यासाठी 73 आरोग्य तपासणी पथके कार्यरत आहेत. शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची या पथकांकडून आरोग्य तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान आढळलेले आजार, समस्या समजून घेऊन त्यावरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी पाठपुरावा केला जातो.

याअंतर्गत 2019 पासून विविध रुग्णालयांशी सामंजस्य करार करून 29 मुलांच्या कानांच्या शस्त्रक्रिया, तर 2018 ते 2022 या कालावधीत 534 हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकी 1 पुरुष वैद्यकीय अधिकारी, 1 स्त्री वैद्यकीय अधिकारी, 1 औषधनिर्माता आणि 1 परिचारिका असलेली पथके गरजू मुलांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले. पुण्यामध्ये रुबी हॉल क्लिनिक, ज्युपिटर हॉस्पिटल आणि आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये आरबीएसकेअंतर्गत उपचार जात आहेत.

अंगणवाडी, शासकीय आणि निमशासकीय शाळांमधील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी आरबीएसके योजनेंतर्गत मोफत उपचारांची सुविधा पुरविण्यात आली आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणतेही मूल उपचारांशिवाय राहू नये, यासाठी या कार्यक्रमांतर्गत प्रयत्न केले जात आहेत.                                                                                                          – डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक

पथकांमार्फत गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विनंती अर्ज आणि इतर कागदपत्रे जमा करून घेतली जातात. जिल्हा रुग्णालयाकडून प्रस्ताव आल्यावर जिल्हा परिषदेच्या सीईओंची मान्यता घेतली जाते आणि संबंधित रुग्णालयाला शस्त्रक्रियेबाबत सूचना दिल्या जातात. रुग्णालयाकडून आलेल्या बिलाची रक्कम शासनाकडून अदा केली जाते. पालकांना एकही रुपया भरण्याची गरज भासत नाही. दरवर्षी जास्तीत जास्त मुलांपर्यंत उपचार पोहचविण्याचा प्रयत्न केला जातो.
                              – आशिष पुरनाळे, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक

Back to top button