टँकरपासून सुटका कधी? फुरसुंगीतील नागरिकांचा सवाल; 73 कोटींची पाणी योजना कागदावरच | पुढारी

टँकरपासून सुटका कधी? फुरसुंगीतील नागरिकांचा सवाल; 73 कोटींची पाणी योजना कागदावरच

फुरसुंगी, पुढारी वृत्तसेवा:  कचरा डेपोबाधित उरुळी देवाची, फुरसुंगी गावांसाठी विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आलेली 73 कोटींची पाणी योजना कधी पूर्ण होणार आणि पालिकेच्या टँकरच्या दुष्टचक्रातून आपली सुटका कधी होणार, असा संतप्त सवाल या गावातील रहिवासी विचारू लागले आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या दोन गावांसाठी ही विशेष पाणी योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पुणे लष्कर पाणीपुरवठा या ठिकाणी या दोन्ही गावांसाठी पाणीपुरवठा आरक्षित करण्यात आला आहे. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीद्वारे हडपसर येथील तुकाई टेकडीवर पाणी आणण्यात येणार असून, या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या 33 दशलक्ष क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी शुद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर हे शुद्ध झालेले पाणी फुरसुंगी व उरुळी देवाची या दोन्ही गावांत उभारण्यात येत असलेल्या विविध क्षमतांच्या 13 साठवण टाक्यांमध्ये पाठवून तेथून जलवाहिनींमार्फत घरोघरी नळांद्वारे या दोन्ही गावांच्या रहिवाशांना पुरविण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रांचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे.

दोन्ही गावांत जलवाहिनी टाकण्याचे कामही बहुतांश ठिकाणी पूर्ण झाले आहे. मात्र, संरक्षण खात्याच्या हद्दीतून येणार्‍या 800 मीटर लांबीच्या जलवाहिनीच्या कामासाठी संरक्षण खात्याची परवानगी मिळत नसल्यामुळे हे काम सुमारे वर्षभर खोळंबले होते. सुमारे वीस वर्षांपासून पुणे महानगरपालिकेच्या कचरा डेपोमुळे या दोन्ही गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले होते. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून दहा वर्षांपासून या गावात पालिकेचे पाण्याचे टँकर येत आहेत. तेव्हापासून शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी हे पाण्याचे टँकर व हे पाणी मिळविण्यासाठी करावी लागणारी धडपड येथील रहिवाशांच्या नशिबी आली आहे. त्यामुळे कधी एकदा पालिकेची 73 कोटींची पाणी योजना पूर्ण होऊन त्याचे पाणी घरी नळाद्वारे येईल, याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. महापालिका प्रशासनाने ही योजना तत्काळ पूर्ण करावी, अशी मागणी कचरा डेपो संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे यांनी केली आहे.

Back to top button