पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी येथील मंडई आणि मोशी येथील उपबाजार समितीमध्ये पावसामुळे रविवारी भाज्यांची आवक कमी झाली होती. त्यामुळे सर्व पालेभाज्या व फळ भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र, लिंबाच्या दरात मोठी घसरण झाल्याचे चित्र दिसून आले.
आठ ते दहा रूपयांना मिळणार्या लिंबाच्या दरात घसरण झाली होती. रविवारी एक रुपयाला लिंबू मिळत होते. किरकोळ बाजारात जागोजागी वीस रुपयांना पंधरा ते सोळा लिंब्यांचा वाटा मिळत होता. कांद्याची आवक 515 क्विंटल झाली असून, बटाट्याची आवक 896 क्विंटल एवढी झाली होती. लिंबांची आवक वाढल्याचे दिसून आले.
पावसाळा सुरू झाल्याने सर्दी, खोकला या आजारांपासून दूर राहण्यासाठी आंबट खाणे नागरिक टाळतात. यासोबतच आवकदेखील वाढल्याने लिंबाच्या दरात मोठी घसरण झाली होती. टोमॅटोची 279 व काकडीची 68 क्विंटल एवढी आवक झाली होती. घाउक बाजारात टोमॅटोला 10 ते 12 रूपये किलो तर काकडीला 15 ते 16 रुपये किलो एवढा भाव होता. फळभाज्यांची आवक 2905 क्विंटल एवढी झाली होती. तर फळाची आवक 211 क्विंटल एवढी झाली असून, पालेभाज्यांची 34560 गड्डयांची आवक झाली होती.
आल्याच्या दरात दुपटीने वाढ
आल्याच्या दरात दुपटीने वाढ झाली होती. दहा ते पंधरा रूपये पाव असलेला आल्याचा दर रविवारी मात्र तीस ते पसतीस रूपये एवढा झाला होता. सातारा जिल्ह्यातून आल्याची आवक होते. सततच्या पावसामुळे शेतकर्यांना शेतात जाणे अवघड झाल्याने आल्याची आवक कमी होत आहे. परिणामी दरात दुपटीने वाढ झालेली आहे. मात्र, स्वयंपाकातील मसाल्यात आले हा घटक महत्वाचा असल्याने ग्राहक खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.