येळसे : पावसामुळे जनजीवन विस्कळीत | पुढारी

येळसे : पावसामुळे जनजीवन विस्कळीत

येळसे : पुढारी वृत्तसेवा : परिसरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच, शेतीचे बांधदेखील फुटले आहेत. भडवली पूल पाण्याखाली गेल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सुखरुप घरी सोडले.
पावसामुळे शेतकर्‍यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.

पवन मावळमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे भडवली पूल पाण्याखाली गेल्यामुळे परिसरात असणारी शिवली- भडवली शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्यात आले. पवनानगर बाजारपेठेत येण्यासाठी भडवली पूल पाण्याखाली गेल्यामुळे येलघोल धनगव्हण, आर्डव येथील नागरिकांचा काही काळ संपर्क तुटला होता.

मावळ तालुक्यातील तुंग – लोणावळा मार्गावरील घुसळखांब येथे रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मावळ तालुक्यातील तुंग-लोणावळा मार्गावरील घुसळखांब येथे रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याचा काही भाग खचून वाहून गेल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे पर्यटकांसह येथील शेतकरी, शाळकरी मुले व कामगार वर्ग यांचा परतीचा मार्ग बंद झाला होता. राज्यभर जोरदार पावसाने हजेरी लावली असून मावळ तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे.

कोकण किनार पट्टीलगत असल्याने मावळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. याच पावसाचा फटका पर्यटकांना बसला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील रस्ता बांधला आहे. मात्र, डोंगरदर्‍यांतून येणार्‍या पाण्यासाठी रस्त्याच्या बाजूने पाणी जाण्यास पर्याय न केल्याने आज ही समस्या उद्भवली आहे. दुपारी एका पर्यटकाचे वाहनदेखील याच ठिकाणी खचले होते. तसेच, हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.

जवण-तुंग रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. परंतु, शिळींब व मोरवे गावच्या हद्दीतील पुलाचे काम अर्धवट अवस्थेता आसल्याने तात्पुरता स्वरूपात केलेल्या जोड रस्त्यावर पाणीच पाणी साचलेले होते.
यामुळे घुसळ खाम येथे रस्ता वाहून गेला व मोरवे पुलावर पाणी असल्यामुळे या मध्य भागात साधारण 35-40 वाहने
अडकली होती.

Back to top button