निमोणे : पुढारी वृत्तसेवा : चिंचणी येथील घोड धरणात सद्य:स्थितीत 26 टक्के उपलब्ध पाणीसाठा आहे. दुसर्या उन्हाळी आवर्तनाचे सर्व नियोजन झाले असून, आदेश मिळताच सोडले जाईल, अशी माहिती शाखा अभियंता किरण तळपे यांनी दिली. एप्रिलच्या मध्यातही घोड धरणात 26 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे लाभक्षेत्रासाठी समाधानाची बाब आहे.
धरण लाभक्षेत्रातील तब्बल वीस हजार हेक्टर क्षेत्र घोड धरणामुळे ओलिताखाली येते. चालू वर्षी मुबलक पाऊस झाल्याने धरण पूर्णक्षमतेने भरले होते. खरीप व रब्बी हंगामाचे योग्य नियोजन करून आतापर्यंत तीन आवर्तने सोडली आहेत. वेळोवेळी नदीपात्रात पाणी सोडल्याने नदीपात्रातील कोल्हापूर पध्दतीचे 5 बंधारे भरून घेतले आहेत.