अकरावी अर्जाचा दुसरा भाग लवकरच | पुढारी

अकरावी अर्जाचा दुसरा भाग लवकरच

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अकरावी प्रवेशाचा कट ऑफ जाहीर करणे आणि गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रक्रिया सीबीएसईच्या निकालानंतर जाहीर करण्यात येणार आहे. परंतु येत्या तीन ते चार दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरण्यास सुरुवात होईल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दहावीचा निकाल लागून महिना होत आला, तरी अद्याप विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरण्याची संधी मिळालेली नाही. निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी मुदत दिल्याने जवळपास दीड महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरला आहे.

अर्जाच्या दुसर्‍या भागात विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, त्यांची प्रवेशाची शाखा, त्यांना अपेक्षित असलेले महाविद्यालय, अशी माहिती भरली जाणार आहे. ही माहिती भरल्याशिवाय प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ङ्गसीबीएसईफच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे माध्यमिक शिक्षण संचलनालयाचे संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button