स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवायच्या की नाही याचा निर्णय सोमवारी: अजित पवार | पुढारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवायच्या की नाही याचा निर्णय सोमवारी: अजित पवार

बारामती, पुढारी वृत्तसेवा: आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवायच्या की नाही, याचा निर्णय सोमवारी मुंबईतील बैठकीत एकत्र बसून घेतला जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पंधरा वर्षांपासून एकत्र असलो तरी स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यावा याचे अधिकार आम्ही जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडे दिले होते. प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी असते. कार्यकर्त्यांचे मते वेगवेगळी असतात. तरीही राज्यस्तरावर एकदा बैठक घेऊन त्यात जे काही ठरेल तो निर्णय सर्वांना कळवला जाईल. पुणे जिल्हा स्तरावरही मी यासंबंधी कार्यकर्त्यांशी चर्चा कऱणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणूका जाहीर केल्यामुळे त्याला सामोरे जावे लागणार आहे. आता निवडणूका जाहीर झाल्यामुळे पर्याय नाही, न्यायालयात जाऊ शकतात पण न्यायालयातही एकदा निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यात बदल करत नाही असा अनुभव आहे. यावेळी सध्या कोकणात पाऊस सुरु आहे, सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.

नियोजन समिती आराखडे स्थगितीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यांना नवीन सरकारने स्थगिती दिली आहे. यासंबंधी बोलताना पवार म्हणाले, याबाबत मी मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलेन, मीही या बातम्या वाचल्या आहेत, ज्या मान्यता दिल्या आहेत, तो निधी जिल्हा नियोजन समितीला दिला होता, याबाबतचा अधिकार त्यांच्याकडे असला तरी हा निधी का थांबविला आहे याबाबत विचारण्याचा आम्हाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे, आम्ही तो विचारु. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून मगच या बाबत भूमिका मांडली जाईल.

ओबीसींना प्रतिनिधित्व मिळायला हवे

ओबीसी आरक्षणाबाबत इम्पिरिकल डेटा जमा झाल्याची माहिती आहे, मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळायला हवे अशी सर्वांचीच भूमिका आहे, ओबीसी वर्गाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळायला हवी अशी आमची भूमिका आहे.

Back to top button