जनसामान्यांचे प्रश्न मांडले जाणार थेट लोकसभेत; खासदार सुप्रिया सुळे यांचा अभिनव उपक्रम | पुढारी

जनसामान्यांचे प्रश्न मांडले जाणार थेट लोकसभेत; खासदार सुप्रिया सुळे यांचा अभिनव उपक्रम

बारामती; पुढारी वृत्तसेवा: समाजातील शेवटच्या माणसाचा आवाजदेखील संसदीय प्रणालीत बुलंद झाला तरच लोकशाही व्यवस्था चिरंतन राहू शकते. त्यामुळे नागरिकांचे मुद्दे लोकसभेत मांडण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी ’सक्रिय सहभाग आणि संवाद : लोकाभिमुख संसदीय कामकाजासाठी’ या देशातील पहिल्या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. याअंतर्गत नागरिकांना आपल्या समस्या किंवा सूचना सुप्रिया सुळे यांच्यांपर्यंत फक्त एका क्लिकवर पोहोचवता येणार आहेत.

खा. सुळे यांनी लोकसभेत वेळोवेळी आपल्या मतदारसंघासह राज्यातील व देशातील अनेक जनहिताच्या विषयांवर आवाज उठवला आहे. त्यांची लोकसभेतील कामगिरी नेहमीच अव्वल असते. त्यामुळे त्यांना अनेकवेळा संसदरत्न या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. यापुढेही जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडताना जनतेचा सहभाग आणखी वाढावा, यासाठी त्यांनी ’सक्रिय सहभाग आणि संवाद’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत नागरिक आपले प्रश्न, विषय, सूचना ’आस्क मी डॉट सुप्रिया सुळे डॉट नेट’ (https://askme.supriyasule या वेबसाईटवरून थेट सुळे यांच्यापर्यंत पाठवू शकतात.

वेबसाइट ओपन केल्यानंतर नागरिकांना एक फॉर्म भरावा लागेल. फॉर्ममध्ये आपली माहिती आणि प्रश्न सविस्तर लिहिल्यानंतर प्रश्न पाठवता येणार आहे. त्यांतर तो प्रश्न खा. सुळे यांच्यापर्यंत पोहोचल्याचा एक एसएमएसदेखील नागरिकांना मिळणार आहे. या उपक्रमाविषयी बोलताना खा. सुळे म्हणाल्या, ‘स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा घेऊन मी राजकारण आणि समाजकारण करत आहे. त्यामुळे संवादावर माझा विश्वास आहे. जनतेचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडण्यासाठी आपल्याला जनता निवडून देत असते. जनतेचा सहभाग यात वाढला पाहिजे, या विचाराने हा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. यात स्वयंसेवी संस्था, नागरिक त्यांचे प्रश्न विचारू शकतात. त्यातील महत्त्वाचे मुद्दे, सूचना, विषय मी संसदेत मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन.

Back to top button