पुणे; पुढारी वृत्तसेवा: प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंबंधी जागृती करण्यासाठी प्रसिद्धी रथ तयार केला असून, कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांच्या हस्ते या रथाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी कृषी उपसंचालक (फलोत्पादन) पल्लवी देवरे, कृषी उपसंचालक (सांख्यिकी) अरुण कांबळे, तंत्र अधिकारी अर्चना शिंदे, भारतीय कृषी विमा कंपनीचे सहायक व्यवस्थापक नितीन कुमार स्वर्णकार, जिल्हा समन्वयक राहुल पालवे आदी उपस्थित होते.
राज्यात खरीप 2022 हंगामात भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्स, एचडीएफसी जनरल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स या कंपन्यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविण्यात येत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून विविध पोस्टर्स, बॅनर्स, चर्चासत्र, कार्यशाळा, शेतकरी मेळावे यांचे आयोजन करण्यात येत आहे.
डाळिंबासाठी 14, सीताफळासाठी 31 जुलैची मुदत
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार 2022 कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकर्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे. मृग बहार 2022 मधील डाळिंब या फळपिकासाठी शेतकर्यांनी अर्ज सादर करण्याची तारीख 14 जुलै असून, सीताफळ या पिकासाठी अंतिम तारीख 31 जुलै अशी आहे. तरी इच्छुक शेतकर्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आवटे यांनी केले आहे.