लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा: धनगरदरा परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. शुक्रवारी (दि. 30) रात्री 12 ते शनिवारी (दि. 1 ऑक्टोबर) पहाटे चार वाजेच्या दरम्यान गणपत बाबूराव जाधव यांच्या तब्बल 25 कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या.
दरम्यान, या घटनेची वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाच्या वतीने त्वरित शेतातील असणार्या ठशांची पाहणी करीन बिबट्या असल्याची खात्री करून शनिवारी सायंकाळपर्यंत पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनरक्षक पूजा पवार यांनी सांगितले. सलग दोन ते तीन दिवस या परिसरामध्ये बिबट्याने दहशत पसरवली आहे.
याबाबत सरपंच सागर जाधव यांनी सांगितले की, सध्या पाऊस चांगला झाला आहे. डोंगरातील झाडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना लपविण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. सततच्या बिबट्याच्या दर्शनाने व हल्ल्याने धामणी ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरली आहे. लवकरात लवकर हा बिबट्या वन विभागाने जेरबंद करावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
दरम्यान, ठशांची पाहणी करताना गणपत जाधव, संजय जाधव, विक्रम बोर्हाडे, अक्षय विधाटे, संजय रामभाऊ जाधव, राजेंद्र जाधव, लक्ष्मण जाधव, सोनाजी जाधव आदी उपस्थित होते.