जिल्ह्यात पावसाअभावी 13 टक्केच पेरण्या | पुढारी

जिल्ह्यात पावसाअभावी 13 टक्केच पेरण्या

पुणे: पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र 1 लाख 84 हजार 274 हेक्टरइतके असून पावसाअभावी पेरण्या मंदावल्या आहेत. सद्य:स्थितीत 24 हजार 605 हेक्टरवर म्हणजे सुमारे 13 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पुरेसा पाऊस व जमिनीत ओलावा झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या 176 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत 83 मिलिमीटर म्हणजे सुमारे 47 टक्के पावसाची नोंद झालेली आहे.

जिल्ह्यात 75 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस 6 तालुक्यांत झालेला आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष झालेले पर्जन्यमानामध्ये बारामती 109 मिलिमीटर, आंबेगाव 107, जुन्नर 126, इंदापूर 98, शिरूर 85, दौंड 89 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याउलट खरिपात नेहमीच अधिक पाऊस असणार्‍या जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तालुक्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याचे चित्र आहे. त्यामध्ये हवेली, मुळशी, भोर, मावळ आणि वेल्हा तालुक्याचा समावेश आहे. पेरण्यांमध्ये भाताच्या रोपवाटिकांखालील क्षेत्र 5 हजार 672 हेक्टर असून अन्य पिकांमध्ये बाजरी 6 हजार 231 हेक्टर, मका 4 हजार 698 हेक्टर, मूग 3 हजार 808 हेक्टर, भुईमूग 793 हेक्टर आणि सोयाबीनचा पेरा 7 हजार 990 हेक्टरवर झाली आहे.

Back to top button