वडगाव मावळ: डस्टबिन प्रकरणात आर्थिक काळाबाजार नाही? खरेदी आदेश, बिलेही अदा नाही; चौकशी समितीचा अहवाल
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील ग्रामपंचयतींना विक्री करण्यात आलेल्या डस्टबिन प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने संबंधित डस्टबिन कोणत्याही ग्रामपंचायतीने खरेदी केले नाहीत, बिलेही अदा केली नाहीत व ते घेण्यासंदर्भात आदेशही दिलेला नाही असे चौकशी अहवालात स्पष्ट केले असून डस्टबिनचे दरही ठेकेदाराने आकारलेल्या दराप्रमाणे असल्याने यामध्ये कुठलाही आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचे या अहवालावरून दिसत आहे.
दोन महिन्यांपूर्वी मावळ तालुक्यातील सर्व 103 ग्रामपंचायतीना डस्टबिन पोहोच झाले होते, तसेच बिलेही पाठविण्यात आली होती. दरम्यान कुठलीही मागणी केली नसताना डस्टबिन व त्याची बिले आल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. कुठलाही आदेश किंवा मागणी नसताना सुमारे 50 लाख रुपयांचे डस्टबिन ठेकेदाराने थेट ग्रामपंचायतीना पोहोच केले, यासंदर्भात पंचायत समितीचे माजी सदस्य साहेबराव कारके, अजीवलीचे सरपंच सचिन शिंदे व पत्रकारांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. तसेच बाजारातील किंमतीपेक्षा जड दराने बिले आकारली असल्याने यामध्ये मोठा काळाबाजार झाल्याचे निदर्शनास आले होते.
दरम्यान, यासंदर्भात गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी यासंदर्भात चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली होती. या समितीचे प्रमुख महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल कोतागडे, शुभांगी भूमकर यांनी नुकताच चौकशी अहवाल गटविकास अधिकारी भागवत यांच्याकडे दिला आहे. या अहवालात म्हटले आहे की, तालुक्यातील कुठल्याही ग्रामपंचायतीने हे डस्टबिन खरेदी केलेले नाही व बिलेही अदा केलेली नाहीत. तसेच कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचार्यांच्या आदेशावरून किंवा सांगण्यावरून डस्टबिन वाटप केलेले नाही, ते घेण्यास बळजबरीही केलेली नाही. याशिवाय शासकीय संकेतस्थळाच्या पोर्टलवर पाहणी केली असता डस्टबिनचा दर 8,775 रुपये दिसत आहे. त्यामुळे यामध्ये कुठल्याही ग्रामपंचायतीने आर्थिक गैरव्यवहार केला नसल्याचे म्हटले आहे.