दापोडी : पुढारी वृत्तसेवा : जुनी सांगवी तलाठी कार्यालयात गेल्या एक महिन्यापासून तलाठीच नसल्याने नागरिकांचे सात बारा नोंदणी, फेरफार नोंद, नवीन दस्त नोंद करून घेणे आदी कामे ठप्प झाली आहेत. सांगवी तलाठी कार्यालय अंतर्गत जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख इत्यादी गावांचा समावेश आहे.
परंतु, सध्या कार्यालयात तलाठी येत नसल्यामुळे नागरिकांचा चकरा माराव्या लागत आहेत. इयत्ता 10 वी आणि12 वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला पुढील शिक्षणासाठी वेळेत अवश्यक असतो; पण तलाठीच उपस्थित नसल्यामुळे नागरिक तसेच विद्यार्थ्यांना हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे सांगवी तलाठी कार्यालयात सात दिवसांमध्ये तलाठीची नेमणूक करावी व नागरिकांच्या होणार्या गैरसोयी दुर कराव्यात. अन्याथा आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे राजू सावळे यांनी दिला आहे.
तहसीलदार गीता गायकवाड जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याने त्यांची भेट झाली नाही. परंतु, नायब तहसील प्रवीण ढमाले यांची भेट झाली असून, त्यांनी भोसरीचे तलाठी आठवड्यातील तीन दिवस सांगवीतील कार्यालयात येतील, असे आश्वासन दिल्याचे साळवे यांनी सांगितले.