मित्रांमुळे घडले आयुष्य : शिवाजी काळे | पुढारी

मित्रांमुळे घडले आयुष्य : शिवाजी काळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘घरची परिस्थिती बेताची असल्याने परिस्थितीतून मार्ग काढणे कठीण होते. मात्र, श्रीनिवाससारखा मित्र आयुष्यात आल्याने कितीही मोठे संकट आले, तरी आयुष्य घडवत गेलो,’ असे मत बारामती होस्टेलचे व्यवस्थापक शिवाजी काळे यांनी व्यक्त केले.
षष्ट्यब्दीपूर्तीनिमित मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते. या वेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, शरयू ग्रुपचे चेअरमन श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, सारिका भरणे, निर्मला काळे, गंधाली काळे, सामाजिक कार्यकर्ते सतीश दराडे, नंदकुमार पानसरे आदी उपस्थित होते.

काटेवाडीसारख्या गावातून पुणे शहरात येऊन आपले आयुष्य घडविणार्‍या शिवाजी काळे यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘माझ्या आयुष्यामध्ये श्रीनिवास पवारांसारखा खंबीर मित्र आला. आयुष्यात अनेक अडचणी आल्या. मात्र मित्र पाठीशी असल्याने कोणतीच अडचण मोठी वाटली नाही. शालेय जीवनापासून मित्राने मला सांभाळले. कधीच कुठल्या गोष्टीची उणीव भासू दिली नाही. श्रीनिवास आणि अजितदादांच्या आईने मला तिसरा मुलगा मानले.’ भरणे म्हणाले, ‘शिवाजी काळे यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला. अनेक माणसे आपल्या आयुष्यात यशस्वी होत असतात. त्यांच्या मागचे कष्ट दिसत नाहीत. काळे यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. मात्र, त्यावर मात करून ती लढाई त्यांनी जिंकली.’

श्रीनिवास पवार म्हणाले, ‘आयुष्यात लहानपणीचे मित्र भेटतात, ते कायमस्वरूपी आपल्याबरोबर असतात. काही माणसे मतलबासाठी जवळ येत असतात. ते एका विशिष्ट वयानंतर आपल्याला समजते. मात्र, शिवासारखा प्रामाणिक मित्र मला भेटला, याच मी भाग्य समजतो.’
लहानपणी खोडकर असलेला शिवा नंतर संयमी आणि मितभाषी झाला. मोठ्यांच्या भोवती वावरणे एवढे सोपे नसते. पण, ते शिवाजीला जमले. पवार कुटुंबीयांची सकाळ पहाटे सुरू होते आणि रात्र उशिरा संपते. यामध्ये कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही, हे त्यांनी जपले. यामुळे कुटुंबीयांचा विश्वास अधिक दृढ होत गेला, असेही त्यांनी सांगितले. स्वागत गंधाली काळे यांनी केले. निर्मला काळे यांनी आभार मानले.

…तो उमेदवार निवडून आणला
सध्या मंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांच्या बारामतीला शिक्षण घेत असतानाच्या आठवणींना काळे यांनी उजाळा दिला. ‘कॉलेजमध्ये असल्यापासूनच राजकीय रणनीतीमध्ये भरणे हुशार आहेत. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना चहा आणि क्रीमरोल खाऊ घालून उभा केलेला कॉलेजच्या निवडणुकीतील उमेदवार बहुमताने निवडून आणला. तेव्हापासून आतापर्यंत भरणे माणसाच्या मनामध्ये घर करून असतात. त्यांना माणसे जिंकण्याची कला अवगत आहे,’ असे त्यांनी सांगितले.

Back to top button