बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा: एकाच खांबावरून अनेक विद्युत जोडण्या दिल्याने तारांचे जाळे तयार झालेल्या बिबवेवाडीतील आंबेडकरनगरसह इतर झोपडपट्टी भागात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत महावितरणकडे पाठपुरावा करूनदेखील कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्याने घरांच्या पत्र्यांमध्ये विद्युत प्रवाह उतरून दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे.
बिबवेवाडी परिसरात असलेल्या प्रेमनगर, आंबेडकरनगर, पोकळे वस्ती, शिवतेजनगर या ठिकाणी वीजपुरवठा हा खांबावरील तारांतून केला जातो. एकाच खांबावरून अनेक झोपडपट्टीधारकांना वीजजोडणी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या खांबावर विद्युत वायरिंगच्या जोडणीचे अक्षरश: जाळे तयार झाले आहे.
पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी वायर घासून पत्र्याला करंट उतरलेला आहे, अनेक ठिकाणी अर्थिंग वायर नसल्यामुळे खांबावरूनदेखील प्रवाह उतरत असतो, याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्यांकडूनसुद्धा त्याकडे लक्ष दिले जात नाही. पावसाळ्यामध्ये सतत ओलावा असतो, तसेच अनेक ठिकाणी असलेल्या व तुटलेल्या आहेत. त्यामुळे पत्र्यावरून विद्युतप्रवाह चालू असताना धोका उद्भवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात याबाबत अनेक वेळा पाठपुरावा केला तरीसुद्धा याकडे प्रशासन विभाग गांभीर्याने पाहत नाही.
येथील काही भागांत अनेक ठिकाणी भूमिगत विद्युतवाहिन्या अजूनही पूर्ण केलेल्या नाहीत. याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे, तरीसुद्धा भूमिगत विद्युत वायरिंग केलेली नाही. परिणामी, याही वर्षी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– संतोष देवेंद्र, स्थानिक नागरिक