भोसरी : विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण | पुढारी

भोसरी : विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण

भोसरी : परिसरातील विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. अचानक वीज गेल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत कधी होईल याची वाट नागरिक पाहत आहेत. महावितरणचा भोंगळ कारभराचा फटका नागरिक व व्यावसायिकांना विनाकारण सहन करावा लागत आहे.

सततच्या खंडित वीज पुरवठ्याने नागरिक मेटाकुटीला आले असून यापासून महावितरण कधी सुटका करणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भोसरी परिसरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत आहे. आदिनाथनगर, गव्हाणेवस्ती, दिघी रोड, भोसरी गावठाण आदी परिसरातील नागरिक विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण झाले आहेत. एकदा वीज गेली तर ती परत तासनतास येत नसल्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होत आहे.

परिसरातील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी वाट पाहणे नित्य नियमाचा खेळ झाला आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. तक्रारीची दखल जर घेतली तर, तात्पुरती दुरस्ती केली जात असल्याने नागरिक वैतागले आहेत.

वीजपुरवठा खंडित होत असल्याचा सर्वांत मोठा फटका दुकादारांना होत आहे. दुग्धजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणत नासाडी होत असून, परिणामी अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. नागरिकांकडून वीज बिलाची रक्कम विद्युत वितरण विभाग तत्परतेने वसूल करते. एखाद्या ग्राहकाने वेळेवर वीज बिलाचा भरणा केला नाही तर तातडीने त्याची वीज जोडणी तोडली जाते. परंतु, वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी संपात व्यक्त केला आहे.

वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणने लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करावा.
– हरीश बाभुळकर,
नागरिक

Back to top button