![हडपसर उड्डाणपुलावरील जड वाहतूक सर्रास सुरू आहे.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F06%2FUntitled-2-6.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
हडपसर: पुढारी वृत्तसेवा
हडपसर उड्डाणपुलावर बसविण्यात आलेले बॅरिकेड्स आत्तापर्यत पन्नास वेळा पडले असतील, तरी प्रशासनाने अद्याप त्यावर कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून, नागरिकांच्या जिवाशी असणारा खेळ थांबवा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.
हडपसर उड्डाणपुलावरील महापालिकेने लावण्यात आलेले हाईट बॅरिकेड्सला वाहने धडकून अपघाताचे सत्र सुरूच आहे. रात्री सोलापूर रोडच्या येणार्या आणि जाणार्या दिशेला हाईट बॅरिकेड्स जड वाहन धडकून तुटून लटकत होते. धोकादायक रीतीने बॅरिकेड्स लटकत असल्याचे पाहून स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी इतर वाहनांचा अपघात होऊ नये, याकरिता स्वतःच्या खर्चाने जेसीबी आणून बॅरिकेट्स बाजूला केले.
पालिका मात्र तातडीने मदत कार्यासाठी येत नसल्याने त्यांचे ढिसाळ नियोजन समोर आले आहे. हडपसर उड्डाणपुलावर राष्ट्रीय महामार्ग सोलापूर रोडच्या दिशेने जाणार्या आणि येणार्या मार्गावर तसेच सासवड रोडवरून शहराकडे येणार्या मार्गावर महापालिकेने जड वाहने येऊ नयेत, याकरिता हाईट बॅरिकेड्स लावले आहेत. दरम्यान, 21 मार्च 2022 रोजी हलक्या वाहनांसाठी उड्डाणपूल सुरू केला होता.
उड्डाणपुलाचे दुरुस्तीचे काम संपल्यानंतर एक महिन्यानंतर जड वाहनासाठी उड्डाणपूल सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र, दोन महिने होऊनही जड वाहनांसाठी पूल सुरू केले नसल्याने हडपसर उड्डाणपूल अपघातग्रस्त ठरत आहे.
हडपसर गावातील राष्ट्रीय तालीम संघाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी इतर वाहनांचा अपघात होऊ नये व दुर्घटनेत जीवितहानी होऊ नये म्हणून स्वतःचा खर्च करून जेसीबी मागवून पुलावरील दोन्ही मार्गावर लटकत असलेले बॅरिकेड्स बाजूला केले, यापुढील काळातही जर याबाबत ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशाराही राष्ट्रीय तालीम संघाने दिला आहे.
उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामानंतर त्याची मजबुती तपासण्याकरिता जड वाहने लवकर सोडता येत नाहीत. याला अधिक कालावधी जाऊ दिला पाहिजे. मात्र, पुलाची पुन्हा एकदा तज्ज्ञांद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्या अभिप्रायानंतरच पूल जड वाहनांसाठी सुरू करण्यात येईल. तोपर्यंत महापालिकेने उपाय योजना केल्या पाहिजेत, असे यावेळी सांगितले.
राजेश पाटील, मुख्य अभियंता, मुंबई एमएसआरडीसी
हेही वाचा