

भीमाशंकर : तब्बल 10 वर्षांपूर्वीची घटना... 30 जुलै 2014 ची सकाळ... रात्रभर पडलेल्या पावसामुळे डोंगराचा कडा कोसळली. प्रचंड आवाज आणि चिखलाचा मोठा लोंढा गावच्या दिशेने वेगाने आला. डोंगरावरील झाडे भिंगरीसारखी उडत खाली आली. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदात संपूर्ण गावच ढिगार्याखाली गाडले गेले आणी या दुर्घटनेत 151 लोक मृत्युमुखी पडले. निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून गाडल्या गेलेल्या दुर्दैवी माळीणच्या घटनेला 30 जुलै रोजी 10 वर्षे पूर्ण होतील.
माळीणकरांच्या जखमेवर मायेची फुंकर हवी असल्याचे मत तेथील हयात असलेले व्यक्ती करीत आहेत. 30 जुलै 2014 रोजी डोंगराने अख्खं माळीण गाव गिळंकृत केले. या दुर्घटनेत 44 कुटुंबांतील 151 लोक दगावले. 9 जण वाचले तर 39 लोक बाहेरगावी असल्याने बचावले. प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबविले. या दुर्घटनेत बचावलेल्या लोकांसाठी तात्पुरते पत्र्याचे निवारा शेडमध्ये पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर आंमडे गावच्या हद्दीत नवीन माळीण गाव वसवण्यात आले. येथे 68 घरे बांधण्यात आली. 1 एप्रिल 2017 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नव्या गावाचा लोकार्पण सोहळा झाला.
दरम्यान नवीन माळीणचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही सुटला नाही. उन्हाळा व पावसाळ्याच्या सुरुवातीला अजूनही माळीणकरांना डोक्यावर हंडा घेऊन आसाणे येथून पाणी आणावे लागत आहे. स्मृतिस्तंभावर सावलीसाठी पत्र्याचे शेड व्हावे, श्रीहनुमान मंदिरासमोर सभामंडप व्हावा, घरांचे छत पावसात गळतात त्याचेही काम झाले पाहिजे. विजेचा नेहमीच खेळखंडोबा होता, नेहमीच भरमसाठ बिले येतात, आदी मागण्या अजूनही प्रलंबितच असल्याचे ग्रामस्थ अमोल अंकुश व दिलीप लेंभे यांनी सांगितले.
आंमडे गावच्या हद्दीत नवीन माळीण गाव वसवण्यात आले. जुन्या माळीण गावाच्या ठिकाणी दगावलेल्या 151 लोकांसाठी स्मृतिस्तंभ बांधण्यात आले. आमच्या आठवणी, भावना या ठिकाणी दडल्या आहेत, अशी खंत येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.